पुणे (मिलन म्हेत्रे) – “पंढरीची वारी आहे माझ्या घरी … । आणिक न करी तीर्थव्रत…’ या तुकोबांच्या अभंगाची प्रचीती सहज घ्यावी असे परभणी जिल्ह्यातील पाथरीजवळील बाभुळगावचे विनायकराव नारायणराव रणेर यांचे घराणे. वारकरी संप्रदायाची परंपरा या घराण्याने तीन पिढ्या सांभाळली आहे. तुकोबांच्या पालखीबरोबर असणारा देवाचा अश्व या घराण्याकडून देहूच्या वारीत सहभागी होतो… आणि पालखीला पांडुरंगाच्या पायाशी नेऊन पोहोचवतो.
माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांबरोबर एक देवाचा आणि एक स्वाराचा अश्व असतो. देवाच्या अश्वावर माउलींच्या आणि तुकोबांच्या पादुका असतात. रणेर घराण्याने ही परंपरा तीन पिढ्यांपासून म्हणजे सुमारे 90 वर्षांपासून जपली आहे.
तुकोबांच्या पालखीबरोबर देवाच्या अश्वाचा मान हा रणेर घराण्याचा आहे, तर स्वाराच्या अश्वाचा अकलुजच्या स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा आहे. आता हा मान धवलसिंह मोहिते पाटील यांनी सांभाळला आहे. पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी हे दोन्ही अश्व देहूमध्ये येतात. यामध्ये बाभुळगावहून येणारा अश्व आधी गाडीने पंढरपूरला नेण्यात येतो. तिथे त्याची विधिवत पाद्यपूजा होते आणि तिथून हे अश्व चालत देहूकडे प्रस्थान ठेवतो.
तुकोबांच्या पालखीबरोबरचा स्वाराचा अश्व हा अकलूजहून मोहिते पाटलांच्या घराण्यातून येतो. ही प्रथा सुमारे 40 वर्षांपासून सुरू आहे. पालखी प्रस्थानाच्या वेळी हा अश्व देहूत येतो आणि देवाचा आणि स्वाराचा असा हा पालखी सोहळ्यात दोन्ही अश्वांचा प्रवास सुरू होतो.
प्रस्थानाआधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्काम
पालखी सोहळ्याच्या दोन दिवस आधी पुण्यातील नवी पेठेतील विठ्ठल मंदिरात बाभुळगावचा देवाचा अश्व येतो. येथे एक दिवस त्याचा मुक्काम असतो. त्यानंतर हा अश्व देहूकडे जातो. बाभुळगाव आणि अकलूजहून आलेल्या या दोन्ही अश्वांचे गोल रिंगण बेलवडी, इंदापूर आणि अकलूज, तसेच उभे रिंगण माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरी येथे होते. पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचल्यावर काल्याच्या कीर्तनानंतर दोन्ही अश्व माघारी फिरतात.
11 दिवसांचा पायी प्रवास
पंढरपूर ते देहू हा 11 दिवसांचा बारामतीमार्गे पायी प्रवास अश्व करतो, त्याच्याबरोबर 50 टाळकरी मंडळी असतात. देहूच्या वेशीवर अश्व आल्यावर त्याची पाद्यपूजा होते, त्याच्यावर तुकोबांच्या पादुका ठेवल्या जातात आणि नंतर अश्व वारीत सहभागी होतो.
वर्षभर मुलासारखा सांभाळ
देवाच्या अश्वाचा रणेर कुटुंब स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करतात. तुकोबांच्या पालखीत सहभागी होणारा हा अश्व इतर कोणत्याही कारणासाठी वापरला जात नाही. साधारण 8 ते 9 वर्षांनी हा अश्व बदलला जातो. रणेर कुटुंब हा अश्व स्व-खर्चाने खरेदी करतात.