आळंदी – कांदा-मुळा भाजी अवघी, विठाई माझी, मोटविहिरी दोरी, अवघी व्यापिली पंढरी। लसूण, मिरची कोथिंबिरी, अवघा झाला “माझा श्रीहरी’ हा अभंग म्हणत हभप सुनिल महाराज कामठे यांनी संतशिरोमणी सावता माळी यांचा जीवनपट कीर्तनाच्या माध्यमातून उलगडला.
आळंदी येथील संत सावता माळी सेवा मंडळ, आळंदी यांच्या वतीने विठ्ठल भक्त संत सावता माळी यांच्या 726 व्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने मंदिरात कीर्तन, भजन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मंदिरात आकर्षक आणि नेत्रदीपक फुलांची सजावट करण्यात आली होती.
संत सावता माळी सेवा मंडळाच्या वतीने संत सावता माळी यांच्या समाधीला शाल, श्रीफळ,पुष्पहार आणि प्रसाद आळंदी शहरातील माळी समाज बांधवांच्यावतीने अर्पण करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका उषा नरके, रुक्मिणी गोरे, राजेंद्र गोरे, किरण नरके, महेश गोरे, संतोष गोरे, समीर गोरे, माऊली कोद्रे, ज्ञानेश्वर जाधव, लक्ष्मण सुडे, शैलेश जाधव, भानुदास आल्हाट, मारुती जाधव आणि समाज बांधव उपस्थित होते.
कामठे म्हणाले की, आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामाच्या अनुभवातून देवाची भक्ती करू पाहत संत सावता माळी जाती-जातीतून भगवद्भक्तीचा गंध फुलवत होते. ज्ञानदेव, नामदेवांच्या काळात सावताबाबा आपल्या रोजच्या उद्योगालाच हरिभक्ती समजून त्यात पूर्णपणे रंगून गेले होते. पूर्णवेळ बागकाम करणारे सावताबाबा आपल्या नित्य उद्योगात रत होऊन जात आणि चित्तात भगवंताचे स्मरण ठेवत. देव सदासर्वकाळ तुमच्या सान्निध्यातच वसतो, हे तत्त्व त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या व्यवहाराने सामान्य जनांच्या मनावर ठसवले.
दरम्यान, हभप गणेश महाराज फड वारकरी आश्रम येथेही भजन, हरिपाठ करून संत सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा करण्यात आला. यावेळी हभप गणेश महाराज, हभप कैलाश महाराज ढगे, हभप थिटे महाराज व विश्रांतवड परिसरातील भाविक उपस्थित होते. नागोराव मुंडे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.