मुंबई – भारतात कोणीही सेक्युलर नसून जे सेक्युलर असल्याचे म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात. सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा राजकारणात चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे, असे रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
“शट अप’ या कुणाल या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात संजय राऊत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. संजय राऊत म्हणाले, सेक्युलर या शब्दामुळे देशात हिंदू मुस्लीम अशी सरळ विभागणी झाली.
तुम्ही केवळ हिंदूंना शिव्या दिल्याने तुम्ही अधिक सेक्युलर असल्याचे म्हटले जाते. हे चुकीचे आहे. मुस्लीमही या देशाचेच नागरिक आहेत. परंतु काही राजकीय पक्ष त्यांच्या मतांचे राजकारण करत असतात. त्यामुळे नुकसान हे देशाचेच होत असते.
ज्या दिवशी मतांचं राजकारण थांबेल त्यादिवशी देश पुढे जाईल, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. केवळ एका निवडणुकीसाठी मुस्लीमांच्या मतदानाचा हक्क काढून घ्या असे ते म्हणाले होते. याचा अर्थ जे मतांचं राजकारण करतात ते यामुळे पळून जातील असा होता. आम्हाला काय म्हणायचे आहे याचा अर्थ समजून घ्या. मतांचे राजकारण या देशात चालू नये, असे वाटत असल्याचेही ते म्हणाले.
देश घटनेच्या आधारावरच चालतो
आपला देश घटनेच्या आधारावरच चालणारा आहे. सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे. या देशात पहिल्यापासून जे राजकारण सुरू आहे त्यात केवळ मुस्लीम धर्माचाच आधार घेतला जात आहे. त्याला आमचा विरोध आहे.
मुस्लीमांनी कुराणवर हात ठेवून, हिंदूंनी भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घ्यायची, हे त्यावेळी बाळासाहेबांनी बंद करायला सांगितले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी संविधानावर हात ठेवून शपथ घ्यायला लावा, असे म्हटले होते. ही आमची विचारधारा आहे आणि तिच राहणार आहे, असेही राऊत म्हणाले.