मुंबई – महाराष्ट्रात 30 दिवसांमध्ये अशा उलथापालथी होत आहेत, रोज इतके नवनवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं देखील कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झाले की ही “महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी’ आहे. यांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच यांचा एकमेव कार्यक्रम सुरू आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
जावडेकर म्हणाले, दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतले. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंह यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतले.
जगात सगळे पाहिले असेल, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिले नसेल. हेही मुंबईने पाहिले. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते.
हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर आता समोर येईलच. नंतर मध्येच परमबीर सिंह यांचे पत्र येते. एका न्यायाधीशांची समिती स्थापन होते. रश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचे पत्र आले. यात ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.