मुंबई – करोनाच्या रुपाने महाराष्ट्र स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेल्या संकटाला सामोरा जात आहे. राज्याचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने या संकटाविरोधात लढत आहे. पण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला पहिल्यापासूनच अगदी मर्यादित सहकार्य केले आहे, अशी टीका मंत्री जयंत पाटील यांनी केली. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडावी अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसत असल्याचे ते म्हणाले.
लसीच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आमने-सामने उभे ठाकले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीचा तुटवडा असून केंद्राकडून लसीचा पुरवठा होत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकार विनाकारण राजकारण करत असल्याची टीका केली होती. या सर्वानंतर मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारने सुरुवातीपासून महाराष्ट्राबरोबर दुजाभाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जयंत पाटील म्हणाले, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष दिसून आला. फक्त महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची एकतर पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती देण्यात आली असावी, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, दिलेल्या लसी याची शहानिशा न करता परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली.
गुजरातला झुकते माप
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 12.30 कोटी आहे. त्यात ऍक्टिव्ह रुग्ण 4.73 लाखांच्या आसपास आहेत. असे असताना राज्याला आतापर्यंत फक्त 85 लाख लसी देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे गुजरातची लोकसंख्या 6.5 कोटी असून त्याठिकाणी ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 17 हजार असूनही 80 लाख लसींचा पुरवठा करत झुकते माप देण्यात आले आहे. देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्या. मात्र तसं मुद्दाम होऊ दिले जात नसल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे.