बेंगळुरू – ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ (मोदी, तुमची कबर खोदली जाईल) असा नारा दिल्याबद्दल कॉंग्रेसची खरडपट्टी काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही एकीकडे बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात आणि जनजीवन सुरळीत करण्यात व्यस्त असताना कॉंग्रेस मात्र आमची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहे.
कर्नाटकात मंड्या आणि हुबली-धारवाड जिल्ह्यात सुमारे 16,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 275 अर्थात बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर सेक्शनचा सहा लेनचा प्रकल्प असलेल्या 118 किमीच्या बेंगळुरू-म्हैसूरू एक्सप्रेसवेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर मंड्या येथे बोलताना मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.
भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या लाटेमुळे कर्नाटकात भाजप सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची ताकदही तिथे वाढते आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आण्इ नंतरच्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आपले स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. बेंगळुरू-म्हैसूर हा प्रकल्प एकूण 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे आणि त्यामुळे बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ सुमारे तीन तासांवरून सुमारे 75 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
मंड्या हे जुन्या म्हैसूर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांपैकी एक आहे ज्यात म्हैसूर, चामराजनगर, रामनगरा, बेंगळुरू ग्रामीण, कोलार, चिक्कबल्लापूर, तुमाकुरू आणि हसन जिल्ह्यांचा समावेश आहे. विधानसभेच्या 61 जागा असलेला जुना म्हैसूर प्रदेश जेडीएसचा बालेकिल्ला आहे. या भागात कॉंग्रेसचीही मोठी ताकद आहे. वर्ष 2018 मध्ये, भाजपने किनारपट्टीवरील कर्नाटक आणि मुंबई-कर्नाटक प्रदेशांमध्ये अपवादात्मकपणे चांगली कामगिरी केली. तथापि, जुन्या म्हैसूर प्रदेश आणि हैदराबाद-कर्नाटक प्रदेशातील काही भागांमध्ये ते स्पष्ट बहुमताने कमी पडले.
वर्ष 2018 च्या निवडणुकीदरम्यान, जेडीएसने वोक्कलिंगा हार्टलॅंड असलेले मंड्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ जिंकले. तथापि, पुढील वर्षी, 2019 मध्ये, केआर पेट मतदारसंघातून जेडीएसच्या तिकिटावर विजयी झालेल्या नारायण गौडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019 ची पोटनिवडणूक जिंकून भाजपला जेडीएसच्या बालेकिल्ल्यात पहिला विजय मिळवून दिला. भाजप आता पायाभूत सुविधांच्या विकासासह मतांमध्ये रूपांतर करण्याच्या आशेने मतदारांना आकर्षित करत आहे.
“बेंगळुरू-म्हैसूर या दोन शहरांदरम्यान प्रवास करणारे लोक जड वाहतुकीची तक्रार करत होते. परंतु आता बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवे हे 118 किमी अंतर अवघ्या एका तासात कापता येईल. बंगलोर आणि म्हैसूर ही दोन्ही कर्नाटकातील महत्त्वाची शहरे आहेत. एक तंत्रज्ञानासाठी आणि दुसरे संस्कृतीसाठी ओळखले जाते. ही दोन्ही शहरे आधुनिक भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. डबल इंजिन सरकारचा हा प्रयत्न आहे की, आम्ही तुमच्या प्रेमाची परतफेड व्याजासह करू आणि जलद विकास करू. आज ज्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली त्याचा हा एक भाग आहे.”
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान