मुंबई :- कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात 242 गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली
सध्या लॉकडाउनच्या काळात बरेच व्हाटसॲप मेसेजेस फिरत आहेत. या मेसेजेस मध्ये लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी, किंवा कोणत्याही वेबसेरीजचे सदस्य subscription स्वस्तात आहे, खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो व एक लिंक दिली असते. आपण कोणीही अशा लिंक्सवर क्लिक करू नये. कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.
तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स, पासवर्डस, डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती, पिन क्रमांक सर्व विचारले जाते. तुम्ही ही सर्व माहिती दिली की, एक ओटीपी येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो. पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो ओटीपी , तुमच्याकडून काढून घेते व काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा एसएमएस येतो की तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे.
त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही खोट्या मोहात फसू नये. तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website )पण नोंद करावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.