मुंबई – शरद पवार यांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. दिल्लीतून व महाराष्ट्रातून भाजप नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत शरद पवार काम करत राहतील, याची मला खात्री आहे, असा विश्वास आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, एका विशिष्ट परिस्थितीत प्रत्येकाला वाटत असते की आपण दुसऱ्यासाठी जागा रिकामी केली पाहीजे.
शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य केले तेव्हाच मला त्यांच्यातील अस्वस्थता जाणवली होती. मात्र, ते तवाच फिरवतील असे वाटले नव्हते. शरद पवारांनी केवळ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. या देशातून, राज्यातून भाजप नेस्तनाबूत होत नाही तोपर्यंत शरद पवार काम करत राहतील, अशी मला पूर्ण खात्री आहे.
राजकीय संन्यास नाही
शरद पवार देशाच्या राजकारणात काम करत राहतील. ते पक्षाच नेतृत्व करत राहतील. शरद पवारांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. ते राजकीय संन्यास घेणारही नाही. असे नेते हे राजकारण आणि समाजकारणाचे प्राण असतात. शरद पवार हे विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत. निवृत्तीचा विषय त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी शरद पवार फक्त पक्षाचे नेते नाहीत. देशातील ते एक महत्त्वाचे नेते आहेत. आम्ही नेहमी शरद पवारांसोबत राहू, असेही राऊतांनी यावेळी म्हटले.
उद्धव ठाकरेंची मुलाखत
पुढे संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत सामनातून येईल. त्यावेळी सर्व शंका, प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली जातील. सत्तांतरावेळी जे काही झाले, त्याबाबत प्रत्येकाची वेगळी बाजू, भूमिका आहे. याबाबत आपली बाजू उद्धव ठाकरे लवकरच मांडतील.