पिंपरी – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पिंपरी-चिंचवड महालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी झाल्यास जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बुधवार दुपारनंतरच थंडावलेल्या इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला पुन्हा सुरुवात केली आहे. तर राजकीय वातावरणही तापू लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली आहे. तत्पूर्वीच निवडणूक आयोगाने प्रभागरचनेला सुरुवात केली होती. मात्र ओबीसी आरक्षणाचा निकाल विरोधात गेल्याने नवीन कायदा करत राज्य शासनाने प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेतले होते. त्यामुळे निवडणुका कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. जवळ आलेला पावसाळा आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला झालेला उशीर यामुळे फेब्रुवारी महिन्यात तयारीला लागलेल्या इच्छुकांनी आपल्या तलवारी म्यान केल्या होत्या. त्यामुळे राजकीय पटलावर शांतता निर्माण झाली होती.
आज बुधवारी (दि. 4) सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगत कार्यकर्त्यांसह इच्छुकांना “तयारीला लागा’चे आदेश दिले आहेत. त्यामुळे निकालानंतर काही वेळातच शहरात प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि भाजपाने तर सत्तेचे गणित जुळविण्यासाठीच्या तयारीलाही सुरुवात केल्याचे पहावयास मिळाले. शिवसेना, कॉंग्रेस आणि मनसेनेही आपल्या परीने आपल्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे संदेश दिल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून शांत झालेल्या राजकीय पटलावर आज चांगल्याच हालचाली दिसून आल्या. आठवडाभरात निवडणूक आयोग कशा पद्धतीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीनचा प्रभाग; यापूर्वीचीच प्रभाग रचना कायम राहणार
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यात प्रारुप प्रभागरचना निश्चित झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचनाही मागविल्या होत्या. तर त्यावर सुनावणी होऊन अंतिम आराखडा मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने कायद्यात बदल केल्यामुळे त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र आजच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने यापूर्वी तयार केलेली प्रभागरचनाच कायम ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे महापालिका निवडणूक तीन सदस्यीच प्रभाग पद्धतीने होणार हे निश्चित झाले असून यापूर्वी करण्यात आलेली प्रभाग रचनाच आता अंतिम होणार आहे. पूर्वीच्या प्रभागरचनेनुसार शहरात एकूण 46 प्रभाग असून त्यापैकी 45 प्रभाग हे तीन सदस्यीय तर एक प्रभाग हा चार सदस्यीय असणार आहे. या 46 प्रभागातून 139 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहे. यापूर्वी तयार केलेली प्रभाग रचना अंतिम कधी होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रशासन “ऍक्टीव्ह मोड’मध्ये
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येताच महापालिका प्रशासनही ऍक्टीव्ह झाले आहे. आज अचानकपणे हालचाली तीव्र झाल्याचे पहावयास मिळाले. प्रारुप प्रभागरचना, हरकती सूचना व सुनावणी पूर्ण झाली असली तरी प्रभागरचना अंतिम झालेली नाही. त्यामुळे प्रभागरचनेचे उर्वरित काम पूर्ण करण्याबरोबरच इव्हीएम मशीनची दुरुस्ती, प्रभागनिहाय मतदार यादी विभाजन, आरओ ऑफिसची ठिकाणे निश्चित करण्याच्या कामांना आता वेग देण्यात आला आहे. प्रभाग रचना अंतिम होताच एसी आणि एसटीच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. सोडत काढण्याचे काम बाकी आहे.
लक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे
निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग कधी जाहीर करणार याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाला आठवडाभरात जाहीर करावा लागणार असून तत्पूर्वी प्रभागरचना आणि आरक्षणाची सोडत काढावी लागणार आहे. या दोन्ही बाबी पूर्ण होताच निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल, असे सांगण्यात येत आहे.
“महापालिकेने प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम मान्यतेसाठी आयोगाला पाठविला आहे. प्रभागनिहाय मतदार यादी विभाजानाचे काम सुरू आहे. ईव्हीएम मशीन दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आरओ ऑफिसची ठिकाणे निश्चित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. निवडणूक विभागाची पूर्णपणे तयारी झाली आहे. आयोगाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.”
बाळासाहेब खांडेकर, सहाय्यक आयुक्त, निवडणूक विभाग