पिंपरी, (प्रतिनिधी) – नागरिकांच्या हक्काच्या दहा टक्के आरक्षित जागेत वसवलेले रावेत येथील मेट्रो इको पार्क परस्पर खोटा पंचनामा करून निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी परस्पर त्याचे प्रवेशद्वार बंद केले व आतील १४० झाडे पाण्याअभावी मारली आहेत.
गेल्या सुमारे वर्षभरापासून ही झाडे जगावीत यासाठी मेट्रो इको पार्क बचाव समिती प्रयत्न करत असून त्याला कोणीही प्रतिसाद देत नाही. परिणामी येथील दुर्मिळ असलेली सुमारे एक हजार झाडे जगावी यासाठी प्रयत्न करणाऱया मेट्रो इको पार्क बचाव समितीने आगामी लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समितीच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.
तसेच येत्या रविवारी (दि. ३१) ते शांततेच्या मार्गाने आपले म्हणणे मांडणार आहेत. मेट्रो इको पार्क वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न समितीच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यात प्रशासनातील प्रत्येकाला भेटलो, पोलीस तक्रारी केल्या, उपोषण केले, मानवी साखळी केली, हरित लवादा ध्ये गेलो तरी देखील कुणीही याला दाद दिली नाही.
स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार व खासदार यांनी देखील फक्त आश्वासन दिले. मात्र, त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नाही. देशात लोकशाही असताना लोकांचे मत व बाजू कुणी ऐकून घेत नसेल तर अशा लोकशाहीचा व लोकशाहीच्या निवडणूक या सर्वात मोठ्या उत्सवाचा काय उपयोग.
जर प्रशासन व लोकप्रतिनिधी जर आमची बाजू व कायद्याची बाजू समजून न घेता त्यांचे निर्णय लादत असेल तर हे मेट्रो इको पार्क वाचवण्यासाठी व पर्यावरण वाचवण्यासाठी लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीचा बहिष्कार करत आहोत, असे समितीच्या पदाधिकाऱयांनी सांगितले.
तसेच येत्या रविवारी (दि. ३१) मेट्रो इको पार्क प्रवेद्वारावर सर्वजण एकत्र येणार आहे. तसेच आपले म्हणणे शांतपणे मांडणार आहेत. सकाळी १० ते ११ या वेळी कोणत्याही घोषणा किंवा निषेध करणार नाहीत. आपले म्हणणे कागदावर लिहून तोंडाला पट्टी बांधून ते थांबणार आहेत, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.