मित्रांच्या हवाल्याने मिळाले संकेत
रांची – जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या खेळीच्या जोरावर सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार बनलेला बेस्ट फिनीशर महेंद्रसिंग धोनी सगळ्याच चर्चांना लवकरच पूर्णविराम देणार असून याबाबतचा निर्णयही येत्या काही दिवसांमध्ये जाहीर करेल, असे संकेत खुद्द धोनीच्या मित्र परिवाराकडून मिळाले आहेत.
इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता, त्यावेळी भारतीय संघाचे त्या
स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यात धोनी धावबाद झाला आणि संपूर्ण देशाने विश्वकरंडक गमावला. खुद्द धोनीच्याही डोळ्यांतून अश्रू वाहिलेले प्रथमच दिसले. एकेकाळी आपल्या आक्रमक खेळाने जगप्रसिद्ध झालेल्या धोनीने या संपूर्ण स्पर्धेत अतिशय संथ फलंदाजी केली त्यावरदेखील टीका झाली व धोनीचा काळ संपल्याचेही बोलले गेले.
विश्वकरंडक स्पर्धेनंतर धोनीने सर्व स्तरांच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली. त्याचवेळी तो संघात पुनरागमन करणार का निवृत्ती घेणार या चर्चा गेल्या 8 महिने चांगल्याच रंगल्या होत्या. एमएसके प्रसाद यांच्या तसेच आता नवनियुक्त सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनीने आधी कामगिरी सिद्ध करावी तरच त्याच्या नावाचा विचार करू असे स्पष्ट केले होते. धोनीनेही त्यावेळी माध्यमांना जानेवारीपर्यंत काहीही विचारू नका असे निक्षून सांगितले होते. त्याचवेळी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) धोनी कसा खेळ करतो यावर त्याचे संघातील पुनरागमन निश्चित होईल असेही निवड समितीने व्यक्त केले होते. त्यानुसार धोनीही संघातील पुनरागमनासाठी सज्ज झाला होता.
त्याने आयपीएलमधील आपला चेन्नई सुपरसिंगच्या संघाकडून परतण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार तो संघाच्या सराव सत्रातही सहभागी झाला होता. त्याचवेळी जगभरात चीनकडून करोना विषाणूंचा धोका निर्माण झाला व त्याने पाहता पाहता उग्र स्वरुप धारण केले. हा धोका लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लावला. त्यावेळी आयपीएलसह अनेक स्पर्धा एकतर पुढे गेल्या तसेच काही स्पर्धा रद्दच करण्यात आल्या. अशा स्थितीत आयपीएल होण्याचे काही निश्चित नसल्याने धोनी येत्या काही दिवसांमध्येच आपली निवृत्ती जाहीर करेल असे संकेत त्याच्या मित्र परिवारानेच दिले. त्याने आपल्या जवळच्या काही मित्रांशी याबाबत बोलून निर्णय घेतल्याचेही समोर येत असून लवकरच तो हे जाहीर करेल.
धोनीने जेव्हा विश्रांती घेतली होती, त्यावेळी निवड समितीने ऋषभ पंत, संजू सॅमसन यांच्यासह अन्यही काही पर्याय वापरुन पाहिले मात्र त्यातील एकालाही सरस कामगिरी करता आली नाही. पंतला तर वारंवार संधी देऊनही तो अपयशीच ठरला त्याचवेळी पंतवर विविध खेळाडू, समीक्षक तसेच सोशल मीडियावरही अनेकांनी टीका केली. तसेच पंतसह संधी दिलेले सर्व पर्याय बाजूला ठेवा व धोनीलाच पुनरागमनाची संधी द्या असे मतही अनेकांनी व्यक्त केले. त्यावेळी संघाचा कर्णधार विराट कोहलीने सलामीवीर फलंदाज व पर्यायी यष्टिरक्षक लोकेश राहुलकडे फलंदाजीसह यष्टिरक्षणाचीही जबाबदारी सोपविली. राहुलने फलंदाजीत तर कमाल करताना आपले वर्चस्व प्रस्थापीत केले तर यष्टिमागेही चांगली कामगिरी करत कोहलीचा विश्वास सार्थ ठरविला.
येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत असून त्यात मात्र संघाकडे नियमित यष्टिरक्षक असावा याच दृष्टिने आता निवड समितीला धोनीचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र, आता जर धोनीने विश्वकरंडक खेळून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला तरी त्याला आधी कोणत्या तरी मालिकेत कामगिरी सिद्ध करावीच लागणार आहे. मात्र, सध्या करोनाचा धोका वाढत असताना प्रत्यक्ष क्रिकेट सुरु होण्यासाठी आणखी किती काळ लागतो व तोपर्यंत धोनी थांबणार का त्यापूर्वीच निर्णय घेणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
आयपीएलचे चित्र स्पष्ट झाल्यावरच निर्णय
यंदाची आयपीएल कालच्या रविवारपासून सुरू होणार होती. मात्र करोनाच्या प्रभावामुळे ती 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा धोका इतक्यात संपुष्टात येण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने ही यंदाची स्पर्धाच रद्द होण्याची शक्यता व्यक्त होत असताना धोनी कधी निर्णय घेणार असे विचारले जात आहे. आयपीएलबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय अपेक्षीत आहे, त्यामुळे काय निर्णय होतो यावर धोनीचा निर्णय अवलंबून राहणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.