सांगली : देशभरासह राज्यात देखील कोरोना संकटाचे काळे ढग गडद होताना दिसतायेत. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार झाली असून राज्यातील २०० पेक्षा अधिक नागरिकांना या विषाणूची लागण झालीये. याच पार्श्वभूमीवर आता शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोना रोगावर उपाय सुचवताना बाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचं बोट लावावं. तसेच सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावं, असे अजब उपाय सुचवलेत.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, आज सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना भिडे यांनी, कोरोनावरील उपचारांत गोमूत्र आणि गायीचं तूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा केला. गोमूत्र, गायीचं तूप, अतितीव्र जंतूनाशकं आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना केंद्र आणि राज्य शासनानं गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केलीये.
याखेरीज कोरोनामुळे मृत पावलेल्या बहुतांश व्यक्ती ६५-७० वयाच्या आहेत. तरुण क्वचितच कोरोनामुळे मृत पावत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे तरुणांना खेळायला सोडावं. सरकारनं लागू केलेल्या बंधनांमध्ये शिथिलता आणावी. अशा सूचनाही त्यांनी सरकारला केल्या आहेत.
इस्लामपुरातील ‘त्या’ कोरोनाग्रस्तांवर ३०७ दाखल करा
हलगर्जीपणामुळे सांगलीतील इस्लामपुरमधल्या २५ जणांना कोरोनाची बाधा झाली. ज्यांच्यामुळे हा प्रकार घडला त्यांच्याविरोधात ३०७ अन्वये गुन्हा दाखल करून बंदिस्त करायला हवं. असं मत त्यांनी मांडलं.