मुंबई – कोल्हापूरच्या रूग्णालयात माझ्या अंगात शाई टाकून मला मारण्याचा डाव होता. तेथील एका कर्मचाऱ्यानेच आपल्याला हे सांगितले होते, असे खळबळजनक वक्तव्य आमदार नितेश राणेंनी केले आहे. त्या कर्मचाऱ्याच्या सल्ल्यामुळे मी ऍन्जिओग्राफी केली नाही, असा दावा त्यांनी केला.
राज्यासह देशात कोकणातील शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण गाजत होते. भाजप आमदार नितेश राणेंवर अनेक दिवस अटकेची टांगती तलवार कायम होती. न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर आता नितेश राणेंनी तेव्हाच्या घडामोडींवर भाष्य केले आहे.
न्यायालयीन कोठडीत असताना मला कोल्हापूरच्या शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. दवाखान्यात नेल्यापासून डॉक्टरांसह मोठा फौजफाटा त्याठिकाणी तैनात करण्यात आला होता. मला डॉक्टरांनी सिटी ऍन्जिओग्राफी करण्याचा सल्ला दिला पण मी नाकारला, असे राणे म्हणाले. दरम्यान, नितेश राणे सध्या संतोष परब हल्ला प्रकरणात जामीनावर आहेत. माझ्या अटकेसाठी वारंवार कलानगर भागातून फोन येत होता, असे म्हणत राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.
नितेश राणेंच्या दबावाला भीक घालू नका – वैभव नाईक
कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल केले असताना मला ठार मारण्याचा सरकारचा प्रयत्न होता, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे, त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठीच नितेश राणे यांनी हा कांगावा चालवला असून त्यांच्या या दबावाला कोणत्याही यंत्रणांनी भीक घालू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केला अशा आरोपाखाली नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ज्याच्यावरच दुसऱ्याच्या हत्येचे कारस्थान केल्याचा आरोप आहे त्यानेच स्वताच्या हत्येचा कांगावा करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आहे, असा दावाही वैभव नाईक यांनी केला आहे.