जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. याआधी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन 14 सप्टेंबरला 17 दिवसांचे उपोषण सोडले. यावेळी मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासाठी सरकारला महिनाभराचा कालावधी देण्यात आला होता. मात्र 40 दिवसांनंतरही सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे.
राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर आज पुन्हा जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांनी जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. जरांगे पाटील यांनी या उपोषणादरम्यान पाणीही घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र संभाजीराजे यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आज पाणी घेतले. पण उद्यापासून पाणीही घेणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.
संभाजीराजे यांनी शिवरायांचे वंशज म्हणून मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेत पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याचे सांगितले.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा पार्ट आजपासून सुरू झाला आहे. आज बुधवार (दि. 25 सप्टेंबर) मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. उपोषणादरम्यान अन्नपाणी, उपचार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळेल ही आशा फोल ठरली असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय असा आरोप त्यांनी केला. तसेच मराठा तरुणांनी हिंसक आंदोलन, जाळपोळ, आत्महत्या करू नका असे आवाहनही त्यांनी केले.
किती संधी सरकारला द्यायच्या?
जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, आता किती संधी सरकारला द्यायच्या? आरक्षण आमच्या हक्काचे आहे, मी माझ्या जीवाची बाजी लावणार. संवादातून आता प्रश्न सुटणार नाही, आता आरक्षण द्या अशी आक्रमक मागणी मनोज जरांगे यांनी केलीय. आज आंदोलनाचा 41 वा दिवस आहे. मुख्यमंत्री यांचा सन्मान केलाय, मुख्यमंत्री यांच्या शपथेचे कौतुक आहे. पण आम्ही जसा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला तसा त्यांनी देखील आरक्षण देऊन सन्मान केला पाहिजे असं जरांगे म्हणाले.
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याशी फोनवर संवाद –
राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी महाजनांनी जरांगेना उपोषणाला बसू नका, अशी वारंवार विनंती केली. मात्र उपोषणाचा निर्णय मागे घेणार नाही. असे थेट उत्तर जरांगेनी गिरीश महाजन यांना दिले. यानंतरही महाजन यांनी जरांगे पाटील यांना विनंती केली. तुम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. हा आमचा शब्द आहे. मागच्या वेळी आम्हीच आरक्षण दिलं होतं. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही आरक्षण देणारच आहोत. तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नका, असे गिरीश महाजन म्हणाले. यावेळी जरांगे म्हणाले, तुम्ही दोन दिवसात गुन्हे मागे घेतो असे म्हटला होता. अजूनही घेतले नाही. गुन्हे मागे घेतले नाही, आरक्षण काय देणार? असा सवालच महाजनांना त्यांनी केला आहे.