नागपूर – आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येत “इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीची मुंबईत तिसरी बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला धक्का बसण्याची शक्यता आहे. एनडीएतील चार ते पाच पक्ष “इंडिया’ आघाडीच्या संपर्कात असल्याचा दावा कॉंग्रेस प्रवक्ते अलोक शर्मा यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत अलोक शर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेल्या “एनडीए’च्या बैठकीत सहभागी झालेल्या 38 पक्षांपैकी किमान चार ते पाच राजकीय पक्ष “इंडिया’ आघाडीच्या संपर्कात आहेत. त्यापैकी काही लवकरच आमच्या गटात सामील होतील अशी अपेक्षा आहे, तर काही 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सामील होतील, असा दावा त्यांनी केला.
देशाचे नेतृत्व कोण करणार यावर ते म्हणाले की, देशाची सद्यस्थिती पाहता नेतृत्व कोण करेल हे महत्त्वाचे नाही, तर एक मजबूत शक्ती म्हणून आम्ही सर्व मिळून या अहंकारी सरकारला कसे हटवू, हे महत्त्वाचे आहे. कारण कोणीही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि प्रदेशांमध्ये नेतृत्व करू शकते. परंतु देशातील सर्वांना एकत्र करण्यासाठी कॉंग्रेस सर्व राज्यांमध्ये एक मजबूत शक्ती म्हणून काम करेल, असेही अलोक शर्मा म्हणाले.