मुंबई – अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा श्रीलंकेत आयोजित करण्याचा आमचा विचार झालेला नाही तसेच असा कोणताही प्रस्ताव मंडळाकडे आलेला नाही. मात्र, असा प्रस्ताव आला तरीही तो फेटाळलाच जाणार याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळाने त्यांच्या देशात ही स्पर्धा खेळविली जाऊ शकते असा प्रस्ताव दिला असल्याचे माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. मात्र, याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. तसेच असा प्रस्ताव आला तरीही तो प्रत्यक्षात आणणे शक्य नाही.
दक्षिण आफ्रिकेत आयपीएल स्पर्धा 2009 साली घेण्यात आली त्यावेळी परिस्थिती भिन्न होती. त्यावेळी भारतात लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यामुळे स्पर्धेला बंदोबस्त देता येणार नाही असे अनेक राज्यांच्या पोलीस यंत्रणेने स्पष्ट केल्याने त्यावेळी स्पर्धा भारताबाहेर खेळविली गेली होती. यावेळी करोनाचा धोका कायम राहिल्याने स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. मात्र, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून करोनाचा धोका संपुष्टात आला तर त्याबाबत विचार केला जाईल, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
राजकारणाची झालर…
आयपीएलसाठी यंदाच्या वर्षी कोणती विंडो रिकामी मिळेल याची पडताळणी सुरू आहे, असे जरी बीसीसीआयने स्पष्ट केले असले तरीही त्याला आयसीसी व बीसीसीआयमधील राजकारणाची झालर असल्याचे बोलले जात आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर हे बीसीसीआयचेही अध्यक्ष होते. मात्र, तरीही त्यांनी आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर सातत्याने बीसीसीआयची कोंडी करण्याची भूमिका वठविली आहे. येत्या मे महिन्यात त्यांची मुदत संपणार असून त्यानंतरच स्पर्धेबाबत विचार केला जाईल, असे संकेत मिळत आहेत.