हिंगोली – कुठलाही धर्म किंवा कुठलाही समाज असो त्या समाजातील त्या धर्मातील व्यक्तीला त्यांच्या देवदेवता बद्दल आदर असतो,अभिमान असतो हे स्वाभाविक आहे. परंतु काही लोक अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वतःची उखळ पांढरे करून पाहत आहेत. अचानक एखादा महाराज एखाद्या गरम तव्यावर मंत्र जप करतो, तर कोणी पाण्यावर तरंगत असतो. अशावेळी देव पावन झाला असे सांगून ही मंडळी समाजातील लोकांना लुटत आहे. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यात घडला आहे. आणि आता चर्चा फक्त पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची ऐकायला मिळते आहे. नेमके कोण आहेत हे बाबा पाहूयात.
मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली तालुक्यातील धोत्रा गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहासाठी ग्रामस्थांनी ह.भ.प. हरिभाऊ महाराज दुर्गसावंगीकर यांना यंदा पाचारण केले आहे. हे बाबा रोज कीर्तनानंतर विहिरीत जाऊन पाण्यावर तरंगण्याचे प्रयोग दाखवितात. कीर्तनापेक्षा जास्त गर्दी यालाच होत असून लोक दाटीवाटीने विहिरीवर जमताना दिसत आहेत.
धोत्रा येथे सुरू असलेल्या या सप्ताहाची ६ एप्रिलला सांगता आहे. हरिभाऊ महाराज व त्यांची पत्नी सुमनबाई यासाठी ज्ञानेश्वरीचे प्रवचन करायला आले आहेत. मात्र हरिभाऊ रोज शेत शिवारात जाऊन विहिरीतील पाण्यावर तरंगून मंत्रोच्चार करतात. तर बाबा पाण्यावर बारा-बारा तास तरंगत असतात, असे भक्त सांगत आहेत.
शिवाजी कनिराम जाधव यांच्या शेतातील विहिरीवर हरी महाराज यांनी पाण्यावर तरंगून राहण्याचा प्रयोग करून दाखविला. तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. वेद व ग्रंथ वाचनामुळे मला ही विद्या प्राप्त झाल्याचे हरिभाऊ महाराज सांगतात. त्याला योगाचाही आधार असल्याचे म्हणतात. मात्र यातून ते लोकांना फसवण्यासाठी किंवा अंधश्रद्धेची बीजे रोवण्यासाठी काही करीत नसले तरीही भाविक मात्र कामधंदे सोडून हा प्रयोग पाहत आहेत.
हात जोडून उभे राहणारे भक्त गर्दी वाढताच चलबिचल करत होते. ही गर्दी इतर दुर्घटनेला निमंत्रण देणारी ठरू नये, याची काळजी ग्रामस्थांनीच घेण्याची गरज आहे. ग्रामस्थांनी याबाबतचे काढलेले व्हिडीओही परिसरात व्हायरल होत असून यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारीची पावली उचलावीत असं सुजाण मंडळीतून बोलले जात आहे.
शिवाजी कनिराम जाधव यांच्या शेतातील विहिरीवर हरिभाऊ महाराज यांनी पाण्यावर तरंगत राहण्याचा प्रयोग करून दाखविला. वेद व ग्रंथ वाचनामुळे ही विद्या प्राप्त महाराज सांगतात. यातून ते लोकांना फसविण्यासाठी किंवा अंधश्रद्धेची बीजे रोवण्यासाठी काही करीत नसले तरीही लोकांमध्ये त्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. यापूर्वी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील एका गावात लहान मुलाच्या अंगात देव दिसत आहे अशी अफवा उठली होती. त्या ठिकाणी सुद्धा यात्रेचे स्वरूप धारण झाले होते. परंतु प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी योग्य ती कारवाई केली होती. परंतु या बाबावर कार्यवाही होणार ….? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या वडिलांपासून ही परंपरा त्यांनी जपली आहे. योगिक क्रियेमुळे त्यांना हे शक्य आहे. हे पाहण्यासाठी त्यांची भाविक मंडळी येथे जमली आहे. मीही त्यांच्याप्रमाणेच येथे आल्याचे शिक्षक असलेल्या मच्छिंद्र चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, पाण्यावर तरंगणे ही क्रिया योगाद्वारेच होऊ शकते. सतत सरावाने ही कला आत्मसात करता येते. ज्यावेळी या घटनेटे व्हिडीओ आणि बातम्या सोशल मीडियावर शेअर झाल्या त्यावेळी अनेकांनी आपणही अशा प्रकारे करू शकतो अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि ग्रामीण भागात अशा पद्धतीने अनेकजण पाण्यावर तरंगतात. त्यामुळे सदर बाबांची ही कोणती जादू नसून ती योगा आणि सरावाने आत्मसात केलेली कला असल्याचे अनेकजण सांगत आहेत.