शेवगाव (प्रतिनिधी) – करोनाची महामारी रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून देशात २३ मार्चला लॉक डाऊन करण्यात आले. तसेच सर्वांनी घरात थांबावे म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली. लोक ही जीवाला सांभाळत घरात थांबत आहेत. शाळा महावियालये, कारखान्यास टाळे लागले. बाजारपेठा, चौक, रस्ते निर्मनुष्य झाले. असे असले तरी जगाचा पोशिंदा बळीराजाला विश्रांती नाही तो आपल्या शेतात दिवसभर राबतो आहे, असे ग्रामीण भागातील चित्र आहे.
सध्या अनेक ठिकाणी गहू हरभरा सोंगणीला आला आहे. कांदा काढणीला आला आहे. अशा वेळी त्याला घरात कसे थांबता येईल. शेतकरी थांबला तर सर्वांच्या खाण्याचे वांधे होतील . सोंगलेला गहू खळ्यात आणण्यापेक्षा शेतातच यांत्रिक पद्धतीने मळणी करण्याची त्याची लगबग चालू आहे. सध्या येथे प्रचंड ऊन पडत असतानाही एखादी पावसाची सर शेतकऱ्य|च्या उरात चर्र करून जाते. वातावरण बेभरवस्याचे झाले असल्याने अशावेळी शेतकर्याची घालमेल होते. घाई गडबड करून खळे उरकून धान्य -शेतमाल घरात उशाला आणून टाकण्याकडे त्याचा कल असतो.
सध्या मजूरही मिळत नाहीत. अशावेळी शेतकरी आपल्या अर्धांगी व मुलांसह ही कामे उरकतो आहे. ती करताना सोशल डिस्टसिंग पाळण्या इतकी समज आज त्याच्याकडे आहे. सोंगणीची कामे करतांना तो लांब अंतराच्या पाथा धरुन एकमेकात दूरी ठेवतो. तो आपल्या उपरण्याचा तर पत्नी आपल्या पदराचा मास्क म्हणून वापर करते.
करोनाच्या संदर्भात झालेली जनजागृती बळीराजाला समजली आहे. मात्र थांबला तो संपला , गेली वेळ पुन्हा येणार नाही म्हणून आपल्याला थांबता येणार नाही ही त्यांची भावना आहे .आपल्या शेतात गहू हरभऱ्याचे खळे करण्यात तो मजबूरीने मशगुल आहे. खळे उरकलेला शेतकरी रान मोकळे होताच उकीरड्यातील खत रानात नेऊन पसरविण्याची व नंतर नांगरट करण्याची त्याची धडपड चालू आहे . पीक घरात आल्यानंतर खरीप हंगामाची पूर्वतयारी करेपर्यंत तरी सध्या त्याला उसंत नाही.