नवी दिल्ली – महामार्गावर आणि मेट्रो रेल्वेत गुंतवणूक, महत्त्वाच्या मत्स्यमारी बंदरांची घोषणा, चहा कामगारांसाठी कल्याण निधी आणि रविंद्रनाथ टागोरांच्या पंक्तींनी केलेला अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा समारोप यावरून या केंद्रीय अंदाजपत्रकाचा रोख 2021-22 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांवर असल्याचे जणावते.
तमिळनाडू, प. बंगाल, केरळ आणि असाम तसेच केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुदुचेरीत यावर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार आहेत. बंगाल आणि पुदूचेरीत विजय मिळवण्यासाठी कोणतीही कसर भारतीय जनता पक्षाने सोडली नाही. तमिळनाडू आणि केरळमध्येही त्यांनी आपली स्थिती सुधारली आहे. तर आसाममध्ये त्यांना सत्ता टिकवायची आहे. ही सर्व राज्ये त्यातल्या त्यात प. बंगाल या लोकसभेचे सर्वाधिक मतदारसंघाच्या क्रमवारीत तिसरं राज्य असणाऱ्या प. बंगालवर भाजपाचा सर्वाधिक रोख आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना रविंद्रनाथ टागोरांच्या काव्यपंक्तींचा आधार घेतला. भारत आपल्या वचनपुर्तीला कसे महत्व देतो आणि करोनोत्तर जगाची अशा यावर भाष्य करत त्यांनी टागोरांच्या “विश्वास हा पक्षी प्रकाश पसरवतो आणि उष:काल होण्याआधी अंधारातच आरवतो, या कव्यपंक्तींचा वापर केला होता.
या अंदाजपत्रकात चहा कामगारांच्या कल्याणासाठी विशेषत: आसाम आणि बंगालमधील महिला आणि त्यांच्या मुलांसाठी एक हजार कोटीची तरतूद सुचवली. प. बंगालमध्ये कोलकाता सिलीगुडी मार्गाच्या आधुनिकीकरणासह 675 किमीच्या महामार्ग कामासाठी 25 हजार कोटीची तरतूद केली. या शिवाय आसाममधील 1300 किमीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 34 हजार कोटीची तरतूद केली आहे. त्यातील 19 हजार कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत.
सीतारामन यांनी केरळमध्ये 1100 किमीच्या राष्ट्रीय महामार्गासाठी 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यात मुंबई कन्याकुमारी महामार्गावरील 600 किमीच्या भागाचा समावेश आहे. गोमोह-दानकुणी भागातील 274 किमीचा पुर्व विशेष वाहतूक कॅरिडोर प्रस्तावित आहे.