पाटणा – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे 33 वर्षीय पुत्र तेजस्वी यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून कमबॅक केले. त्याशिवाय, बिहारमधील सत्ताबदलाच्या घडामोडींमध्ये ते किंगमेकरही ठरले आहेत. तेजस्वी यांनी साथ दिल्यानेच भाजपला सत्तेबाहेर घालवून मुख्यमंत्री नितीश कुमार आसन टिकवू शकले.
तेजस्वी यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ स्वप्नवत आणि कुणालाही हेवा वाटावा असा ठरला. सुमारे सात वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा आमदार बनले. त्यापाठोपाठ त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यावेळची विधानसभा निवडणूक (2015) नितीश यांचा जेडीयू, राजद आणि कॉंग्रेसने एकत्र येत आघाडी स्थापन करून लढवली. त्या आघाडीने निवडणुकीत बाजी मारून सरकार स्थापन केले. त्या सरकारचे नेतृत्व अर्थातच नितीश यांनी केले.
त्यावेळी अतिशय कमी वयात उपमुख्यमंत्रिपद सांभाळणारे तेजस्वी चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय बनले. मात्र, ते आघाडी सरकार फार काळ टिकले नाही. एका भ्रष्टाचार प्रकरणात तेजस्वी यांचे नाव आले. त्यामुळे नितीश यांनी आघाडीमधून बाहेर पडून 2017 मध्ये पुन्हा भाजपबरोबर सरकार स्थापन केले.
ती घडामोड तेजस्वी यांची राजकीय पीछेहाट करणारी ठरली. त्यावेळी लालू तुरूंगात असल्याने तेजस्वी यांच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यानंतर 2019 मधील लोकसभा निवडणुकीने राजदला प्रचंड हादला दिला. त्या निवडणुकीत जेडीयू-भाजपचा समावेश असणाऱ्या एनडीएने बिहारमधील 40 पैकी 39 जागा पटकावल्या. राजदला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे तेजस्वी समर्थपणे राजदचे नेतृत्व करू शकतील का, याविषयी साशंकता व्यक्त होऊ लागली.
पण, तेजस्वी डगमगले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांची महाआघाडी 2020 मधील विधानसभा निवडणुकीला सामोरी गेली. त्या महाआघाडीने निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला अतिशय अटीतटीची लढत दिली. निसटता विजय मिळवून एनडीएने पुन्हा सरकार स्थापन केले. पण, त्या निवडणुकीत सर्वांधिक जागा जिंकून राजद सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्यामुळे लालूंचे राजकीय वारसदार बनण्यास आणि राजदचे नेतृत्व करण्यास तेजस्वी समर्थ असल्यावर शिक्कामोर्तब झाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी प्रभावी कामगिरी करून दाखवली. आता बिहारमधील सत्ताबदलानंतर तेजस्वी यांची सत्ताधाऱ्याच्या भूमिकेत वापसी झाली आहे.