नवी दिल्ली – कोकणवासीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र न्या. उदय लळित हे देशाचे 49वे सरन्यायाधीश होणार आहेत. 27 ऑगस्टला न्या. उदय लळित हे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी त्यांची भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्ती आदेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. वर्तमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.
कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राज्यघटनेच्या कलम 124 च्या कलम-II च्या तरतुदींनुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपती मुर्मू यांनी न्या. उदय लळित यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती 27 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल. न्या. लळित यांचा कार्यकाळ तीन महिन्यांपेक्षा कमी असेल. 8 नोव्हेंबर रोजी ते वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होणार आहेत. सरन्यायाधीश म्हणून ते कॉलेजियमचे प्रमुख असतील, ज्यात न्या. चंद्रचूड, न्या. कौल, न्या. नझीर आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांचा समावेश असेल.
न्यायमूर्ती लळित यांच्या घराण्यात वकिली पिढीजात चालत आलेली आहे. आजोबा, चार काका आणि त्यांचे वडील सर्वजण वकिली करायचे. उदय लळित यांचे आजोबा वकिली करण्यासाठी आपटे येथून सोलापूर येथे स्थायिक झाले. त्यांची आजी त्याकाळी भारतात डॉक्टर झालेल्या काही मोजक्या स्त्रियांपैकी एक “एलसीपीएस’ डॉक्टर होत्या. उदय लळित यांचे वडील ऍड. उमेश लळित हेही मुंबई उच्च न्यायालयाने नामनिर्देशित केलेले ज्येष्ठ वकील होते. ते 1974 ते 76 या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी अतिरिक्त न्यायाधीश होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.