खडकवासला – पुणे-पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावाच्या हद्दीतील पूल पुन्हा खचल्यामुळे वाहतूक धोकादायक पद्धतीने चालू असून पानशेत परिसरातील बावीस गावांचा आणि वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीही पावसाळ्यात खचलेल्या पूलाचे काम नुसत्या डागडुजीवर भागवल्याने यावर्षी ही वेळ आली असून सार्वजनिक बांधकाम विभाग कामासाठी निधी मंजूर असूनही केवळ डागडूची करून नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकाऱ्यांसह या फुलाची पाहणी केली.
सोनापूर गावच्या हद्दीत अगदी डोंगरकड्याला लागून वळणावर हा रस्त्याचा भाग असून रस्त्याची रूंदी संपल्यावर लगेच नदीचा तीर आहे. नदी पात्रापासून रस्त्याची उंची साधारण 40 ते 50 फूट उंच असल्याने आणि तेथे पक्का खडक नसून मुरमाड जमीन आहे. पानशेत- वरसगाव धरणातून येणारा पाण्याचा प्रवाह या पूलाच्या खालच्या बाजूला धडकतो त्यामुळे तेथील पूल मातीसह मूळ रस्त्यापासून खाली एकदीड फूट सरकला आहे.
गेल्या महिन्यातच पावसात अशी घटना घडल्यावर प्रशासनाने तातडीची उपाययोजना करून कॉंक्रीट च्या सहाय्याने 60-70 मीटर पडलेली भेग बुजवली होती. कालही चार पाच दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे नदीपात्राच्या बाजूकडून पुन्हा या रस्त्यावर अशीच मोठी भेग पडल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे नुसत्याच दुरूस्ती निरूपयोगी ठरत आहे. आता ही येथील परिस्थिती अशीच असून केवळ एका बाजूने धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असून नागरिक आपल्या वाहनांसह जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
दरम्यान प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आज खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी अपत्तीग्रस्त स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सांगितले की या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पावसाळा संपताच पुलाचे नव्याने काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.