नाशिक – गेल्या काही दिवसांपासून अजित पवार सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनेकवेळा महत्वाच्या बैठकांना ते गैरहजर राहिल्यामुळे चर्चांना जोर आला होता. मात्र या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले असून या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी शेतकरी मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, ‘मी नाराज असल्याने मंत्रिमंडळ बैठकीला गेलो नाही, अशा बातम्या प्रसारित करण्यात आल्या. अरे बाबा तब्येत ठिक नव्हती, कुठं मंत्रिमंडळ बैठकीला जाता…
ओबीसी बैठकीतही माझ्यात आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली, अशा बातम्या चालवल्या गेल्या. आरे कशाची खडाजंगी… ही बातम्या आल्यानंतर मी भुजबळांना फोन केला आणि विचारले, ‘कधी आपल्यात खडाजंगी झाली का?’… म्हणजे काहीही चालू आहे. पण, लोकांना बातम्या वाचून खरे वाटते. हे तीन पक्षांचे सरकार आहे. घर चालवत असताना कारभाऱ्याला अडचणी येत असतात. येथे वेगवेगळ्या विचारधारा आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे असल्याने आम्ही एकत्र आलो आहे,” असे अजित पवार यांनी सांगितले. ते सरकारमध्ये नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शेतकरी सन्मान मेळाव्यासाठी कळवणला येण्यापूर्वी अजित पवार यांनी सप्तशृंगी गडावर जात सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यानंतर ते कळवणला रवाना झाले होते. येथील मेळाव्यात बोलताना त्यांनी सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. अजित पवार यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक होणार असून आजच्या दिवशी शब्द देतो की, सोमवारी 81 कोटी 86 लाखाचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेला तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल, अशी घोषणाच यावेळी अजित पवार यांनी केली.