मोरगाव – बारामती तालुक्यातील तरडोली (Tardoli) येथील दूध दरवाढीबाबत (milk price) सागर पंडीत जाधव यांनी सुरु केलेले उपोषण आज सातव्या दिवशी मागे घेण्यात आले.
बारामती तहसीलदार गणेश शिंदे यांनी जाधव यांनी केलेल्या मागण्यांबाबत आश्वासित केल्यानंतर त्यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले.
आज सागर जाधव यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रुपये दर मिळावा यासाठी बारामती तालुक्यातील तरडोली येथे आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणाचा आज सातवा दिवस असून काल (दि. ६) तालुक्यासह जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी एकत्र येउन रस्ता रोको केला होता.
तसेच पुणे बारामती रस्त्यावर दुध ओतून तिव्र निषेध व्यक्त केला होता. आज सातव्या दिवशी दुपारी १ वाजता तहसीलदार गणेश शिंदे यांनी स्थळी भेट दिली. उपोषणकर्ते जाधव व उपस्थित शेतकऱ्यांनाबरोबर चर्चा केली.
यावेळी पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समीती माजी प्रशासक दिलीप खैरे, पंचायत समिती माजी सदस्य राहुल भापकर, सुपा पोलीस स्टेशनचे नागनाथ पाटील,
माजी सरपंच नवनाथ जगदाळे, महेंद्र तांबे, सतीश गायकवाड, आश्विनी गाडे, स्वाती गायकवाड, अनिल कदम, शरद भापकर, बाळासाहेब भापकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना आश्वासीत करताना तहसीलदार शिंदे यांनी सांगितले की, ‘दुध दर वाढीबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करणार आहे.
तसेच पाझर तलावात पाणी सोडणे यांसह इतर तालुका पातळीवरचे विषय तात्काळ सोडवणार असल्याचे सांगितल्यानंतर शिंदे यांच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन सागर जाधव यांनी उपोषण सोडले.