नवी दिल्ली – क्रीडा कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सलग 19 दिवस सुरू असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन सोमवारी आणखी तीव्र करण्यात आले. दिवसभर शेतकऱ्यांनी उपोषण केले. दरम्यान सरकार चर्चेची पुढील तारीख ठरवण्यासाठी शेतकरी नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.
ही बैठक नक्की होईल. आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत, असे तोमर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. सरकार कोणत्याही चर्चेला कधीही तयार आहे. शेतकरी नेत्यांनी ते पुढील बैठकीसाठी कधी तयार आहेत, हे ठरवावे आणि आम्हाला सांगावे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पंजाब आणि हरीयाणासह अख्ख्या देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. तेथे कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देत निदर्शने केली. पंजाबमध्ये लुधीयाना, पतियाळा, संग्रुर, बर्नाला, भटिंडा, मोगा, फरिदकोट, फिरोझपूर आणि तरण तारण येथे तीव्र निदर्शने केली. हरियाणात फतेहबाद, जींद, सिरसा, कुरूक्षेत्र, गुरगाव, फरिदाबाद, भिवनी, कैथाल आणि अंबाला येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली.
दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या निदर्शनांचा सोमवारी 19 वा दिवस होता. सर्व 32 शेतकरी संघटनांच्या अध्यक्षांनी सकाळी आठ वाजता उपोषणास सुरवात केली. दरम्यान अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करणाऱ्या भारतीय किसान युनियनने उपोषणात सहभाग घेतला नाही.
कायदे सामान्यांच्या विरोधातच – केजरीवाल
कृषी कायदे हे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विरोधातच आहे. त्यामुळे महागाई वाढणार आहे. ते काही मुठभर भांडवलदारांच्या लाभासाठी बनवण्यात आले आहेत, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांशी खेळले जाणारे घाणेरडे राजकारण केंद्र सरकारने थांबवावे. केजरीवाल यांनी उपोषणात सहभाग घेतला.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे आंदोलन
शेतकरी करत असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात राज्यभर आंदोलन केले. पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पक्षाच्या वतीने करण्यात आला.