मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला असून आजही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात आज 6 हजार 112 नवे रुग्ण आढळल्याने करोनाचा विळखा अधिक घट्ट झाला आहे. तसेच आज 44 करोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
नवीन वर्षात लस आल्याने करोनाला हरवणे शक्य होईल, असे बोलले जात असतानाच पुन्हा एकदा करोना संसर्ग वेगाने पसरू लागला आहे. राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ तर झालीच आहे, त्याचबरोबर रुग्ण बरं होण्याचे प्रमाणही घटले आहे. 10 दिवसात तब्बल ऍक्टिव्ह 10 हजार रुग्ण वाढले आहेत.
दरम्यान, राज्यात करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण, तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.