मुंबई – दिशा सालियन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.
9 तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. त्यानंतर सोडण्यात आले, असे म्हटले होते. मात्र राणे यांनी खोटा दावा केला असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दिंडोशी न्यायालयाने दोघांनाही अटकेपासून दिलासा दिल्यानंतर राणे पितापुत्र जबाब नोंदवण्यासाठी मालवणी पोलिसांसमोर हजर झाले होते. राणे यांनी दिशाची आई वासंती यांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ऍड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
आरोपींना 5 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोपी हजर राहिले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केले नाही. आपल्याकडे असलेली माहिती आपण सीबीआयला देऊ अशी खोटी विधानं वारंवार केली. तसेच चौकशी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चौकशी दरम्यान फोन केला होता, असे खोट विधान केले आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
आरोपींच्या सदरील बोलण्याचा रोख साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येतो. यामुळे तपासात अडथळे निर्माण करीत आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास ते भविष्यात तपासात कोणतंही सहकार्य करणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.