पाटणा – गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्थात 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने एकहाती यश संपादन केले होते. 2019 मध्येही भाजपने तशीच कामगिरी नोंदवली. उलट 2019 मध्ये या पक्षाला अधिक जागा मिळाल्या.
दरम्यानच्या काळात प. बंगाल, केरळ ओडीशा असे मोजके अपवाद वगळता हा पक्ष सातत्याने निवडणुका जिंकतो आहे. देशाच्या राजकारणाच्या पटलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जोडीला अमित शहा यांचा उगम झाल्यानंतर भाजपची ही घोडदौड सुरू झाली आहे.
बिहारच्या यंदाच्या निवडणुकीतही चुरशीच्या लढती होत असल्या तरी या निकालाचे कल पाहता मोदी यांची लोकप्रियता अद्याप कायम असून जनमत अजुनही त्यांच्या बाजूनेच असल्याचे अधोरेखित होत आहे. थेट शब्दांत सांगायचे तर मोदी फॅक्टर अजुनही देशात निर्णायक ठरतो आहे.
मोदींनी यावेळीही बिहारमध्ये डझनभर सभा घेतल्या.
इतर राज्यांत त्यांना तसे आव्हान मिळाले नाही. मात्र बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या सभांमुळे मोदी यांच्या सभांचे ग्लॅमर काहीसे झाकोळले जात असल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र निकालाचा कल पाहता मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी जेथे जेथे सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांनी एकतर विजय तरी मिळवला आहे, अथवा विजयी आघाडी घेतली आहे.
सासाराम, गया, भागलपूर, दरभंगा, मुजफ्फरपूर, पाटणा, छपरा, पूर्व चंपारण, समस्तीपूर, पश्चिम चंपारण, सहरसा आणि फार्बिसगंज येथे पंतप्राधानांनी सभा घेतल्या होत्या. भागलपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराने विजयी आघाडी घेतली होती, तर दरभंगाच्या 10 जागांपैकी 9 ठिकाणी रालोआचे उमेदवार आघाडीवर होते. मुजफ्फरपूर, पाटणा या भागातही जेथे जेथे मोदींच्या सभा झाल्या तेथील आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. सहरसा येथेही तीच स्थिती होती.
निवडणुकीचा हा कल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता अद्याप कायम असून काही राज्यांत झालेल्या पिछेहाटीमुळे तिला ओहोटी लागलेली नाही. करोनामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात बिहारच्या कामगारांना सगळ्यांत जास्त फटका बसला. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात आदी राज्यांतून मोठ्या संख्येने बिहारी कामगार आपापल्या गावी परतले. त्यांची प्रवासात मोठी आबाळ झाली. काही उपासमारीने मेले तर काही दुर्घटनेच्या भक्ष्यस्थानी पडले.
त्याचाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फटका बसेल असा कयास वर्तवला जात होता. मात्र सुरूवातीचे म्हणजे रात्री आठ वाजेपर्यंतचे चित्र पाहिले तर ते भाजपसाठी फारसे निराशाजनक नव्हते. रालोआला हा विजय अथवा आघाडी सुखावणारी असली तरी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची लोकप्रियता घसरणीला लागली असल्यावर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे.