मुंबई – मुंबईतील बीकेसी मैदानावर महाविकासआघाडीची वज्रमूठ सभा सुरु असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या भाषणातून सरकारवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, ‘आमची महाविकास आघाडीची ही लढाई ही या राक्षसांविरुद्ध आहे.
आमची आघाडी ही तुटकी फुटकी नाही. काँगेस हे कायम शिवसेनेच्या सोबत आहे. शिवसेनेनं ज्यांच्या सोबत २५ वर्ष सोयरीक केली त्यांनीच खंजीर खुपसला. त्यांची औकात औलाद आणि इतिहास देखील तोच आहे. अशा शब्दात भाई जगताप यांनी भाजपवर टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘खोके सबकुछ ओके’ सरकारने संभाजी नगरची सभा अयशस्वी करण्यासाठी यांनी प्रयत्न केले. परंतु आम्ही ते हाणून पाडले. आजची सभा नागपूरच्या सभे पेक्षा मोठी आहे. आज कोणाचा विश्वास बसला नसता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, एकत्र येतील परंतु या महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलो.
हे असंविधानिक सरकार पाप करत आहे. अशावेळी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आणि काळाची गरज ओळखून आम्ही सर्वजण या खोके सरकार विरुद्ध एकत्र आलो आहे, असे मत भाई जगताप यांनी व्यक्त केले आहे.