– महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज मुंबईतील बीकेसी मैदानावर सुरु आहे. सभेला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असून भाषणातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरु आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील वज्रमूठ सभेला संबोधित केलं. यावेळी भाई जगताप यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर घडलेला एक किस्सा सांगितला. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उभी फूट पडली असतानाच उद्धव ठाकरे यांना खुद्द सोनिया गांधी यांनी फोन केल्याचा गौप्य्स्फोट भाई जगताप यांनी केला आहे.
काय म्हणाले भाई जगताप?
यावेळी भाई जगताप यांनी सोनिया गांधी शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनचा तपशील सांगितला. जगताप म्हणाले, शिवसेनेत बंड झाल्याची बातमी सोनिया गांधी यांच्या कानावर पडताच त्यांनी, उद्धव ठाकरे यांना फोन केला. उद्धव ठाकरे यांना धीर देत त्यांनी आपण व आपला काँग्रेस पक्ष आपल्यासोबत असल्याचे सांगितले. काहीही झालं तरी आम्ही तुमची साथ सोडणार नसल्याचे सोनिया गांधी उद्धव ठाकरेंना म्हणाल्याचे भाई जगताप म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडूनही अनेकदा उल्लेख
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील अनेक वेळा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांचे जाहीर कौतुक केले आहे. आपण ज्यांना आपलं समाजत होतो, ते आपल्याला सोडून गेले मात्र जे तुम्हाला सोडून जातील (काँग्रेस व राष्ट्रवादी) अशी भीती दाखवण्यात आली ते माझ्यासोबत कायम राहिले असं उद्धव ठाकरे यांनी अनेकदा जाहीररीत्या मान्य केलं आहे.
महाविकास आघाडीची वज्रमूठ भाजप – शिंदेंसाठी डोकेदुखी?
नुकत्याच झालेल्या बाजार समितीची निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. दुसरीकडे पक्ष म्हणून भाजपला बाजार समितीत सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी शिंदे गटासोबतची त्यांची कामगिरी अत्यंत सुमार अशीच राहिली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकदिलाने काम केलेल्या ठिकाणी त्यानं विजय खेचून आणता आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी भाजप – शिंदे गटाचं टेन्शन वाढवणार असच दिसतंय.