कोलकाता/नवी दिल्ली – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वाहनाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये असणारा तणाव विकोपाला गेला आहे.
राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस प्रमुखांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पाठवलेल्या समन्सनुसार त्यांना दिल्ली न पाठवण्याचा निर्णय तृणमूल सरकारने घेतला आहे. 14 डिसेंबर रोजी राज्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्याला उपस्थित राहण्याचे आदेश मला देण्यात आले आहे, असे राज्याचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. त्याला उपस्थित राहण्याचे आदेश मला देण्यात आले आहेत. त्यावरून राज्य सरकार या प्रकरणाकडे अतिषय गांभीर्याने पहात असल्याचे स्पष्ट होते, असे या दोन पानी पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याचा अहवाल राज्यपाल जगदीप धनकड यांनी केंद्राला पाठवला होत्या. त्यानुसार या दोन अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले होते. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीविषयी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये निमंत्रित करण्यात आले होते, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा अहवाल राज्यपालांनी पाठवला होता. त्यात मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवण्याच्या सूचना केल्या होत्या, असे त्या अहवालात म्हटले होते.
त्यामुळे त्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना निमंत्रित केल्याचे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. भल्ला यांच्या गुरूवारी पाठवलेल्या पत्राला या दोन्ही अधिकाऱ्यांनी उत्तर पाठवले नसल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
कोलकात्यातील डायमंड हार्बरकडे जात असतानाच नड्डा यांच्या ताफ्यावर दगड विटांचा मारा करण्यात आला होता. त्यात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या वाहनांची हानी करण्यात आली. त्यात या दोन नेत्यांसह 10 कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले होते. या हल्यानंतर केंद्राने राज्य सरकारकडून याबाबतचा अहवाल मागवला होता.
दरम्यान, राज्यपाल धनकड यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. हा लोकशाही चौकटीवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेचे पालन करावे. त्यांनी त्यापासून दूर जाऊ नये. दीर्घकाळापासून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळत आहे. काल झालेली घटना अतिषय दुर्देवी होती, असेही ते म्हणाले.