श्री क्षेत्र देहू –
संतकृपा झाली ख इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवे घातला पाया ख उभारिले देवालया ।।
या अभंगाच्या निरूपणा प्रमाणे कार्तिकी एकादशीनिमित्त वैष्णव, वारकरी-भाविकांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनार्थ तीर्थक्षेत्र देहूच्या मंदिरात गुरुवारी (दि. 11) गर्दी केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या नियम, अटी, शर्तीचे पालन करीत श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने भाविकांची काळजी घेण्यात येत होती. देहूरोड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कार्तिकी एकादशीनिमित्त दोन-तीन दिवसांपूर्वीपासून वैष्णवांचा मेळा, वारकरी-भाविकांची देहूत संत श्री तुकाराम महाराज श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनार्थ गर्दी होत होती. मात्र यंदा करोनाच्या महामारी संकटाने शासनाने तीर्थक्षेत्र आळंदी येथे आणि परिसरातील 10 गावांमध्ये संचारबंदी करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थित श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा करण्याचे आदेश केल्याने राज्यभरातून दाखल होणाऱ्या सुमारे साडेतीनशेहून अधिक दिंड्यांना सोहळ्यात सहभागी होता येणार नसल्याने भाविकांच्या मनात खंत आहे.
मात्र तीर्थक्षेत्र देहू येथे श्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या तसेच श्री विठ्ठल-रुक्माई यांच्या दर्शनार्थ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त महाद्वार तसेच मुख्य मंदिरांवर रंगबिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरामध्ये सामाजिक अंतराचे पालन व्हावे, यासाठी संस्थानच्या वतीने चौकोन आखण्यात आले होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर बॉक्स उभारण्यात आला होता. स्वयंसेवकांच्या वतीने भाविकांची थर्मल गणने तपासणी करण्यात येत होती. दोन ते तीन तासांच्या अंतराने संपूर्ण मंदिर (सॅनिटायझर) औषध फवारणीने निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. शासनाने पारित केलेल्या आदेशाचे भाविकही पालन करत दर्शन घेत होते.
मुख्य मंदिरामध्ये भाविकांना दर्शन बारीने तर वैकुंठगमनस्थान मंदिरात दर्शनार्थ भाविकांनी गर्दी केली होती. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
कार्तिकी एकादशीनिमित्त म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा संजीवनी सोहळ्यासाठी राज्यातून येणाऱ्या लाखो भाविकांची तीर्थक्षेत्र आळंदी येथे प्रतिवर्ष गर्दी होत होती. संत ज्ञानेश्वरांच्या दर्शनानंतर हेच भाविक तीर्थक्षेत्र देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनार्थ येत असतात. संत ज्ञानदेवांनी भक्तीचा पाया उभारला, तर संत तुकोबांनी कळस उभारला. महाराष्ट्राचे वारकरी सांप्रादायाचे अस्मिता असणारे संत आहे. वैष्णवांचा मेळा, भाविक, वारकरी कार्तिकी एकादशीच्या उपवासा (व्रत) नंतर असणारा दुसरा दिवस म्हणजेच बारशी दिनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनार्थ हजारो भाविक देहूत दाखल होत असत. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या दिंड्या, भाविकांच्या उभारणाऱ्या राहुट्या तसेच लाखो भाविकांच्या उपस्थित परिसरात यात्रेचे स्वरूप येत होते. पहाटे पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर स्नान विधीसाठी होणारी गर्दी यंदा दिसून आली नाही. ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ।। तुकाराम – तुकाराम हरी च्या जयघोषाने दुमदुमणारी, भक्तिरसात न्हाऊन निघणारी देहूनगरी शांत होती.
रस्त्यांच्या दुतर्फा उभारणारी भगवंतांची फोटो, तुळशीमाळा, पाने-फुले, खेळाचे साहित्य, खाद्यपदार्थ, अमृततुल्यची दुकाने, पथारीवाले, हॉटेल्स आदींमुळे यात्रेचे येणारे स्वरूप मात्र यंदा आले नाही. नेहमी भरणाऱ्या यात्रेतील लाखो भाविकांच्या महापुराचे मात्र यंदा खूपच तफावत स्पष्ट होत होते.