उस्मानाबाद – देणगी देणारा व्यक्तीच खरा श्रीमंत असतो. लाखो, करोडो रुपयांची संपत्ती असलेले लोक कधी एक रुपया कोणाला देत नाहीत. मात्र एक गुठाही जमीन नसलेला, राहायला पक्के घर नसलेल्या व्यक्तीने शाळेसाठी 1 लाख 35 हजार रुपयांची देणगी दिल्याने ते महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत, असे म्हणायला काही हरकत नसावी. आत्माराम सोनवणे असे या श्रीमंत व्यक्तीचे नाव असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील खामसवाडी गावातील रहिवासी आहेत.
आत्माराम सोनवणे हे शेतमजूरी करून आपला चरीतार्थ भागवितात. 2016 साली त्यांचा मुलगा गोपळचे निधन झाले. गोपाळ न्यायालयात सेवक म्हणून नोकरीला होता. मुलगा गेला आणि आत्माराम यांनी मुलाची शाळाच दत्तक घेतल्याचे चित्र आहे. आत्माराम हे मुलाच्या स्मृती निमित्त दरवर्षी 600 विद्यार्थांना जेवण देतात. तसेच वाचनालय चालवतात. त्याचबरोबर त्यांनी मागील वर्षी शाळेत 35 हजार रुपये खर्चून लाईट फिंटिंग करून विद्यूत उपकरणे बसवली आणि यावर्षी त्यांनी शाळेला एक लाख रुपये देणगी दिली असून त्या पैशांतून शाळेतील मुलांना बसण्यासाठी बाक बणविण्यात येत आहेत.
आज आपल्या राज्यात करोडोंची संपत्ती असलेले बरोच लोक आहेत. सोबत काहीही घेऊन जायचे नाही हे सर्वांना माहिती आहे. मात्र तरीही ते कोट्याधीश लोक कधी कोणाला कवडीची मदत करत नाहीत. दुसरीकडे सोनवणे यांचेकडे काहीच नाही. ना शेत, ना नोकरी, ना उद्योगधंदा. परिस्थितीने गरीब परंतु मनाने ते श्रीमंत आहेत. या शेतमजुराला मुलांनी शिकावे असे वाटते. त्यासाठी ते करत असलेले काम खूप मोठे आहे. हे काम महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत माणूसच करू शकतो, म्हणून ते राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरत आहेत.