उस्मानाबाद – येथील एका 20 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर “सॉरी भावांनो…..’ असा मेसेज टाकून व तोच वर्गमित्रांनाही पाठवून या तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. तर याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आविष्कार मोहन भोजने (वय 20 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.
येथील तुळजापूर खुर्द येथील आविष्कार भोजनेच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून सोमवारी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर वडिलांवर असलेल्या कर्जामुळे आविष्कार सतत तणावाखाली वावरत होता. यातूनच त्याने आत्महत्या केल्याच्या दुर्वास भोजने यांच्या खबरीवरून पोलिसांनी नोंद घेतली आहे.
आविष्कार हा तुळजापूर शहरातील तुळजाभवानी महाविद्यालयात कला शाखेच्या पदवी तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी रात्री आपल्या मोबाइलवरून आविष्कार याने वर्गातील जवळच्या मित्रांना सॉरी भावांनो असा मेसेज पाठविला. तसेच, सोशल मीडियातही हा मेसेज पोस्ट करून त्याने आपले जीवन संपविले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्या काही मित्रांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आविष्कारच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आला.