कर्जत – काही दिवसांपूर्वी सांगितले होते की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे, त्यानुसार घर फोडले, पक्ष फोडला. त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या आधी कॉंग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा गौप्यस्फोट कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदार, पदाधिकाऱ्यांना शरद पवार यांच्या वयाबद्दल बोललेले आवडलेले नाही, त्यामुळे लवकरच ते परत येतील असा विश्वास देखील रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर पवार हे पहिल्यांदाच कर्जत या त्यांच्या मतदारसंघात आले होते. “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यात शरद पवार यांचे वय काढल्याने 30 ते 40 टक्के लोक हे मागे फिरण्याच्या तयारीत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती ही आमदारांची देखील आहे. पुढच्या 10 ते 15 दिवसांत बघा काय परिस्थिती राहते, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार पुढे म्हणाले की, राज्यातील भाजपवरील लोकांचा विश्वास उडालेला आहे. तेव्हा ते गणित बसवण्यासाठी मत विभाजणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पक्ष फोडीचे राजकारण लोकांच्या प्रेमासाठी केलेल नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केलेल नाही, एका चांगला विचारासाठी केलेले नाही, फक्त सत्तेत येण्यासाठी भाजपने केलेले आहे. मात्र लोकांना भाजपचा डाव कळून चुकला आहे. महाराष्ट्रातील जनता भाजप पक्षाला नकारात्मक भूमिकेतून बघत आहे. त्यामुळे आधी शिवसेना फोडली, नंतर राष्ट्रवादी पक्ष फोडला, असे राजकारण सुरु आहे. कुठूनतरी आपल्या हातात सत्ता ठेवणे हाच एकमेव उद्देश भाजप पक्षाचा आहे.
भाजपाला धडा शिकवणार
येत्या काळात पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करावे लागणार आहे. भाजप पक्षाच्या गलिच्छ विचाराशी लढण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज असून येत्या काळामध्ये “बीजेपी’ला धडा शिकवायचा आहे, असा निर्धार नेते आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा खरी परिस्थिती समोर येईल. या पक्ष फुटीबाबत लोकांमध्ये काय चर्चा आहे, यावरून राजकीय नेत्यांना अंदाज आला आहे, असेही पवार पुढे बोलताना म्हणाले.