एकेकाळी जगाची निम्मी लोकसंख्या भारतात राहत होती
वाराणसी : मानवजातीच्या विकासाच्या इतिहासाबद्दल जगाच्या पाठीवर सर्वत्र संशोधन सुरू असते कारण याबाबत सर्वांनाच उत्सुकता आणि कुतूहल आहे. आता बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनाप्रमाणे एक नवीन निष्कर्ष समोर आला असून 25 हजार वर्षांपूर्वी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या फक्त भारतात राहत होती असे या संशोधनात म्हटले आहे.
वाराणसीमध्ये झालेल्या एका शैक्षणिक अधिवेशनामध्ये प्रोफेसर ज्ञानेश्वर चौबे यांनी याबाबतचे संशोधन सादर केले आहे. प्रोफेसर चौबे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जरी मानवाची निर्मिती आफ्रिकन खंडामध्ये झाली असली तरी या मानवाचे पालन पोषण मात्र भारतीय भूमीवरच झाले म्हणूनच 25 हजार वर्षांपूर्वी जगातील निम्मी लोकसंख्या फक्त एकट्या भारत देशामध्ये राहत होती. ज्ञानेश्वर चौबे यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी 25000 डीएनएस सॅम्पलची चाचणी केली. या डीएनए सँपलची तुलना युरोप आफ्रिका अमेरिका आणि इतर खंडातील नागरिकांच्या डीएनए सँपलशी करण्यात आली तेव्हा हा निष्कर्ष समोर आला.
प्रोफेसर चौबे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पंचवीस हजार वर्षांपूर्वी बहुतांशी लोक अरबी समुद्राचा प्रदेश बंगालची खाडी आणि हिमालयन क्षेत्रामध्ये राहत होते. या क्षेत्रामध्ये मानवी वसाहतीसाठी योग्य वातावरण आणि खाण्यापिण्याच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढत गेली.
नंतरच्या कालावधीमध्ये हे लोक जगाच्या इतर विभागांमध्ये विस्थापित झाले. याच कालावधीमध्ये माणसाने दगडापासून शस्त्र आणि इतर उपकरणे तयार करण्याचा शोध लावला होता आणि त्याचे पुरावेही आता उपलब्ध असल्याचा दावा ज्ञानेश्वर चौबे यांनी केला आहे