यमाजी मालकर
सेवा आणि उत्पादन क्षेत्रात आर्टिफिशयल इंटलिजीयन्स, यंत्रमानव, डिजिटल व्यवहार यांचा सध्या बोलबाला आहे. लॉजिस्टिक आणि मालवाहतूक क्षेत्र त्याचा वेगाने वापर करू लागले आहे. पुरवठा आणि दळणवळण हे संघटित, वेगवान आणि आपोआप होते आहे. त्याचा ग्राहक आणि नागरिक म्हणून आपला जवळचा संबंध आहे, तो आपण मान्य करणार की त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहोत?
व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि अगदी शेतीची कामे संघटित पद्धतीने, अधिक वेगवान आणि यांत्रिक पद्धतीने म्हणजे आपोआप करावयाची सोय झाली, तर त्याला कोणी नाही म्हणणार नाही. खरे म्हणजे आतापर्यंतचा या सर्व क्षेत्राचा प्रवास असे सांगतो की या सर्व गोष्टी स्वीकारूनच जग पुढे चालले आहे. त्यालाच जग आधुनिक काळातील बदल म्हणते आहे. अलीकडच्या काळात या बदलाचा वेग अधिकच वाढला आहे, त्यामुळे त्याची विशेष दखल घ्यायची, नाहीतर त्याची खास दखल घेण्याची तशी गरज नाही. या बदलाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कामाचे व्यवस्थापन अधिक काटेकोर केले जाते. खर्च केला जात असेलल्या प्रत्येक पैशाचा हिशेब ठेवला जातो. एकच काम दोन ठिकाणी करण्याचे टाळले जाते. पैशासोबत श्रम आणि ऊर्जेची अधिकाधिक बचत केली जाते. याला आपण साधारण काम संघटित करणे म्हणतो. हे काम कमीत कमी वेळेत व्हावे, यासाठीची सर्व तयारी केली जाते आणि ज्या कामांमध्ये तोचतोचपणा आहे, त्या ठिकाणी यंत्रांचा भरपूर वापर केला जातो. विशेषतः जेथे मनुष्यबळ महाग होत जाते, त्या त्या ठिकाणी थेट यंत्रांना काम दिले जाते, म्हणजे एकप्रकारे ते यंत्र आपोआप काम करत राहते! कारण ते थकत नाही.
मालाचा साठा करणे आणि त्याची वाहतूक करणे, हा एक महत्त्वाचा उद्योग असून त्यात हे नवे मंत्र किती ठळकपणे दिसू लागले आहेत, त्याची काही उदाहरणे पाहिली, की हा बदल किती वेगाने होतो आहे, हे लक्षात येते. अशा या बदलांना चांगले किंवा वाईट, अशी नावे दिली जातात, पण ती तशी दिली तरी त्या बदलात फार फरक पडत नाही. कारण हे बदल व्यवहारिक कारणांसाठी होत असतात. एकमेकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी होत असतात. आपल्याच गाडीत प्रवाशांनी बसावे, यासाठी सहा आसनी रिक्षा गावाच्या चौकात चालू करून ठेवली जाते, हे प्रवासी वाहतूक स्पर्धेत जेवढे साहजिक आहे, तसेच हे आहे.
आता दैनंदिन जगण्याचा वेग एवढा वाढला आहे की त्या वेगाला साजेशी स्पर्धा करणे क्रमप्राप्त झाले आहे. माल किंवा वस्तू लवकर न मिळणे, त्यांचे वाहतूक करण्यात अधिक वेळ जाणे, प्रवासात वस्तूंचे नुकसान होणे, एकाची वस्तू दुसऱ्याला जाणे, वस्तू वेळेत आणि सुरक्षित पोचविण्यासाठी अधिक खर्च येणे, हे या उद्योगाने अडथळे मानले आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
या प्रयत्नांचे आपल्या जवळील सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे ई कॉमर्स कंपन्या आणि त्या वस्तू घरपोच पोचण्यासाठी करत असलेल्या सुधारणा. ऍमेझॉन, फ्लिफकार्टसारख्या शेकडो कंपन्या सध्या या स्पर्धेत पळत आहेत. अगदी आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे मुंबईजवळील भिवंडी शहर. या उद्योगाने या शहराचे रूपरंगच बदलून टाकले आहे. या कंपन्या जो माल घरपोच पोचवत आहेत, त्यांचा साठा करणे, मागणी येताच त्या वस्तू गोदामातून बाहेर काढणे, तो त्या त्या गावाच्या मालगाडीमध्ये चढविणे, त्या गावात पोचल्यावर त्याचे वाटप छोट्या मालगाड्यात करणे, तो त्या गावातील विशिष्ट ठिकाणी पोचवून घरात पोचविणाऱ्या माणसाला वेळेत मिळेल, हा सर्व प्रवास किती कमी वेळात केला जाऊ शकतो, या सर्व गोष्टींची पश्चिम भारतातील सुरुवात सध्या भिवंडीपासून होते. थोडक्यात लॉजिस्टिक हा एक मोठा उद्योग होऊ घातला असून त्याचे एक मोठे केंद्र भिवंडी झाले आहे, पण लॉजिस्टिकचे केंद्र भिवंडी एवढ्यापुरतेच ते नाही. तर एक ग्राहक म्हणून आपला आणि या बदलांचा कसा संबंध आहे, हे समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. उदा. ही उलाढाल एवढी प्रचंड आहे की दर 30 सेकंदाला एक मालगाडी येथून बाहेर पडते. सुमारे 100 कंपन्यांची साठ लाख पार्सले येथून दररोज रवाना होतात. साडेतीन लाख कामगार आज तेथे काम करत आहेत. गेल्या 10 वर्षांत तेथील जमिनीच्या किमती 150 पट वाढल्या आहेत. हे झाले भिवंडीचे, पण भारतातील हा उद्योग आता 8 हजार कोटी रुपयांचा झाला असून पुढील पाच वर्षांत त्यात 36 टक्के वाढ होणार, असे अंदाज आहेत.
मालवाहतूक हा याचा पुढील भाग. भारतात 80 टक्के मालवाहतूक ही रस्ते मार्गाने होते. सध्या तिची उलाढाल दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढते आहे आणि ती 2020 मध्ये 215 अब्ज डॉलर होईल, असा आर्थिक पाहणी अहवालातील अंदाज आहे. त्याला वेगवान करण्याचे काम जसे फास्टॅग करू लागले आहे, तशा अनेक सुधारणा सध्या होत आहेत. टोल नाक्यावर टोल द्यावाच लागणार, हे आपण आता स्वीकारले आहे. पण तेथे रांगेत वेळ जाऊ नये, अशी आपली रास्त अपेक्षा आहे. ही अपेक्षा फास्टॅगच्याच मार्गाने पूर्ण होऊ शकते. मालवाहतूक उद्योगात सव्वादोन कोटी रोजगार आहेत, यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते. मालाच्या वाहतुकीची ज्यांना गरज आहे, त्यांची आणि मालवाहतूकदारांचा संपर्क होणे, कमीतकमी वेळेत तो माल गाडीत योग्य पद्धतीने भरणे, त्या मालगाडी कोणत्या मार्गाने जातं आहे, याचा माग (ट्रॅकिंग) काढणे, तो माल उतरविणे आणि लगेचच जेथे गरज आहे तेथे पोचविणे, याला आता अतिशय महत्त्व आले आहे. या कामात जे अडथळे येत होते, ते कमी करून हे काम अधिक वेगवान करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यात जेथे मनुष्यबळ हा अडथळा ठरत होता, तेथे यंत्रमानवाची मदत घेतली जाते आहे. यंत्रमानव वापरल्याने खर्च कमी होत असेल तर त्याचा स्वीकार वेगाने केला जात असल्याचे दिसते आहे. अशा क्षेत्रात हा अपरिहार्य प्रवास आहे, हे समजून घेतले पाहिजे.
एकूणच वाढणाऱ्या वेगात वाट पाहणे, ही जर सर्वात वेळखाऊ, खर्चिक आणि कंटाळवाणी बाब असेल तर वाट पाहणे कमी करणे, एवढाच त्यावर मार्ग राहतो. त्यामुळे जग त्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करणार, हे ठरलेले आहे. या सर्व प्रक्रियेत जेथे जेथे मानवी हस्तक्षेप होतो, तो कमी करण्याचा प्रयत्न होणार, हेही ओघाने आलेच. आर्टिफिशयल इंटलिजीयन्स, यंत्रमानवाचा वापर, डिजिटल व्यवहार अशा वर्तमानातील बदलात त्याची प्रचिती येते आहे, पण त्याचा एक परिणाम समाजाला आणि सरकारला गंभीर विचार करायला लावणारा आहे. तो म्हणजे या बदलांमुळे सेवा आणि उत्पादने यात प्रचंड वाढ झाली आहे आणि त्या वेगाने ग्राहक तयार होत नसल्याने सर्वत्र मंदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
या सर्व पेचप्रसंगात खरी गरज आहे ती जास्तीतजास्त नागरिकांची क्रयशक्ती वाढण्याची. त्यासाठी रोजगार वाढला पाहिजे. आहे त्या परिस्थितीत रोजगार वाढविण्यासाठी संघटित क्षेत्रातील मनुष्यबळाचे तास कमी केले पाहिजेत आणि शक्य तितक्या अधिक माणसांना रोजगार दिला पाहिजे. संघटित क्षेत्रात आठऐवजी सहा तासांच्या दोन शिफ्टमध्ये देश चालविणे महत्त्वाचे ठरते. ज्यामुळे संघटित क्षेत्रातील रोजगार एकदम दुप्पट होईल आणि या मार्गाने सेवा आणि उत्पादन क्षेत्राला उठाव येईल. जी भारताची आज सर्वात कळीची गरज आहे. सेवा आणि उत्पादनांचा वापर वाढला म्हणूनच विकसित देश, प्रचलित विकासाच्या व्याख्येत पुढे गेले आहेत, हे विसरता येणार नाही. त्यांना कदाचित या बदलाची आज तेवढी गरज नसेल, पण भारतासारख्या 135 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला असा क्रांतिकारक बदल स्वीकारल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही.