राजेंद्र मोहिते
कराड – ‘माणदेशी नेतृत्व आणि परखड वक्तृत्व’ असलेल्या आ. जयकुमार गोरे यांनी भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हयात कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार जुन्या-नव्यांमध्ये अनेक फेरबदल करत राजकारणावर जबरदस्त कमांड असलेल्या आ. गोरेंनी जिल्ह्यात सध्या एककलमी कार्यक्रम सुरु केल्याने जिल्हा भाजपमध्ये आता ‘नवा गडी नवं राज्य’ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी सातारा जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केली. यामध्ये पूर्व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना भाजपा प्रदेश सचिवपदी संधी देण्यात आली. तर गत विधानसभेवेळी भाजपवासी झालेल्या आ. जयकुमार गोरे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. अर्थात, याला गत विधानसभेचे अनेक कांगोरे आहेत. परंतु, आगामी सर्वच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुण, तडफदार, लोकप्रिय व परखड नेतृत्व असलेल्या आ. जयकुमार गोरेंचा भाजपला चांगला फायदा होऊन जिल्ह्यात भाजपला एक नवी उभारी मिळेल; असे चित्र आहे.
सध्या जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचे जिल्ह्यात कार्यकर्ता संवाद मेळावे सुरू आहेत. या मेळाव्यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रभावी नेतृत्व व वक्तृत्वाची तरुण, युवक, कार्यकर्त्यांवर चांगली छाप पडत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात, हाच त्यांच्या संवाद मेळाव्याचा किंबहुना भाजपचा प्रमुख हेतू असून या माध्यमातून जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमळ फुलवण्याच्या मोहिमेचे हे प्राथमिक यश असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ‘हिंदुत्वाचा चेहरा’ अशी ओळख असलेल्या पूर्व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा भाजपला स्थिरता देऊन भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम केले. त्याची पोचपावती गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपच्या वाढलेल्या मतांच्या टक्केवारीवरून मिळते. परंतु, दरम्यानच्या खांदेपालटामुळे हे यश नूतन जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या पदरी पडणार असून एकंदरीत जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दक्षिणेचे महत्व कमी?
गत विधानसभेवेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह राज्यमंत्री पदाचा विशेष दर्जा असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले या कराड दक्षिण मतदार संघातील भाजपच्या तीन शिलेदारांचा जिल्हा भाजपावर दबदबा होता. दरम्यान, राज्यात स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार, त्यानंतरचे सत्तारूढ शिंदे-फडणवीस सरकार आणि सध्या जिल्हाध्यक्ष पदाचीही खांदेपालट झाल्याने जिल्ह्यातील अनेक समीकरणे बदलली आहेत. त्यात नूतन जिल्हाध्यक्षांच्या एककलमी कार्यक्रमामुळे तुलनेत कराड दक्षिणचे महत्व काही अंशी कमी झाल्याची चर्चा दक्षिणेतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.