पिंपरी, दि. 19 – निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन जुमले जाहीर करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर भाजपाने आता नवे गाजर दाखविण्यास सुरुवात केली आहे. कॅनबे चौक ते निगडी हा तळवडे, चाकण एमआयडीसीला जोडणारा रस्ता हा त्याचाच एक भाग असून, गतवेळी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजपने आता हे नवे गाजर दाखविले आहे. त्यामुळे शहरवासीयांनी सावध व्हावे आणि भाजपच्या जुमल्यांना बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केले आहे.
वरपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेची निवडणूक कधीही घोषित होऊ शकते. त्यामुळे “ऍक्टीव्ह मोड’मध्ये आलेल्या भाजपमधील अनेकजण जनतेला भूलथापा मारून सत्ता पदरात पाडून घेण्याच्या तयारीत आहेत. सध्या निगडी ते तळवडे, चाकण या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कठीण बनला आहे. गेल्या पाच वर्षांत यावर एकही उपाय न शोधणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी कॅनबे चौक, तळवडे ते भक्ती शक्तीचौक असा रस्ता करण्यात येणार असल्याची तसेच महापालिका आयुक्तांनी त्यावर कार्यवाही सुरू केल्याचे जाहीर केले आहे.
जो रस्ता महापालिका आयुक्तांच्या हद्दीबाहेरून जातो, त्याबाबत आयुक्त निर्णय घेऊच शकत नाही, याची जाणीव असतानाही केवळ निवडणुकीत मते घेण्यासाठी त्यांनी सुरू केलेला प्रकार अत्यंत दुर्देवी आहे. आयुक्त ज्या कॅनबे चौक ते निगडी रस्त्यावर काम सुरू करणार आहेत तो रस्ता देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतून जातो. रेडझोनमधून हा रस्ता जाणार असल्याचे दर्शविण्यात आले त्यावर केवळ संरक्षण मंत्रालय निर्णय घेऊ शकते ही वस्तुस्थिती आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला देशाच्या संरक्षणा संदर्भातील साहित्य, दारुगोळा व इतर अत्यंत स्फोटक वस्तू साठविल्या जातात. त्यामुळे देशाच्या संरक्षणाला देखील धोका पोहोचू शकतो, याची जाणीव असतानाही जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या उद्देशाने त्यांनी सुरू केलेल्या उद्योगाला जनतेने आता फसू नये, असे आवाहनही रविकांत वरपे यांनी केले आहे.
रेडझोनच्या प्रश्नाचे काय?
महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत रेडझोनचा प्रश्न सोडविण्याचे गाजर दाखविणाऱ्या भाजप नेत्यांनी आतापर्यंत हा प्रश्न का सोडविला नाही? याचे उत्तर जनतेला पहिल्यांदा द्यावे. व्हिजन 20-20 देखील फसवेच निघाले आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आता फसव्या घोषणा करून जनता भुलथापांना बळी पडणार नसून येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला जागा दाखवून देईल, असा विश्वासही रविकांत वरपे यांनी व्यक्त केला