राज्यातील राजकारणात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आणि या यात्रेदरम्याचे वीर सावरकरांबाबतचे वक्तव्य चांगलेच गाजले. राहुल गांधींनी महाराष्ट्रात प्रवेश करताच सावरकरांबाबत टीका करायला सुरुवात केली. गांधींच्या या टीकेला महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्त्युत्तरही दिले. वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्याचे राजकारण थांबत नाही तरच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापणार हे नक्की आहे. राज्यपाल कोश्यारींनी याअगोदरही महाराष्ट्रातील थोर व्यक्तींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत.
“शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श, मी…”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपालांनी केले.
“शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श, मी…”; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त वक्तव्य
कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारींनी म्हटले की,“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील.”
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याअगोदरही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडकडून कोश्यारींच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. शिवाजी महाराज हे जागतिक स्तरावरचे आदर्श नेते होते. शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही आणि कशाशीही होऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.
मात्र आता राज्यातील शिंदे सरकार आणि मनसेचे राज ठाकरे मूग गिळून गप्प बसणार की, राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्राच्या इतिहासाची आठवण करून देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली होती. आता कोश्यारींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर ते आक्रमक होणार का? असा सवाल निर्माण झालाय.