नवी दिल्ली – नीट आणि जेईई परीक्षेवर स्थगिती आणली जावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका महाराष्ट्रासह सहा राज्यांकडून दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना करोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तसेच प्रवासात येणाऱ्या अडचणींची दखल घेतली नसल्याचे पुनर्विचार याचिकेत नमूद केले आहे.
सर्वोच्च न्ययालयाने 17 ऑगस्ट रोजी नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात बिगरभाजप सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.
दरम्यान, जेईई व नीट परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जेईई मुख्य परीक्षांना अवघा आठवडा बाकी असून नीट परीक्षेसाठी पंधरा दिवस बाकी आहेत. देशभरातील विद्यार्थी आणि पालकांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. जेईई परीक्षा 1-6 सप्टेंबर तर नीटची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे.