सुशांतसिंहप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका
पुणे – सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कधीही आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नसल्याचे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, सीबीआय तपासात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा याप्रकरणी डिवचले.
या आत्महत्याप्रकरणी ठाकरे सरकारमधील एका युवा नेत्याकडून मुंबई पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. त्यावरून भाजपचा रोख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर असल्याचे बोलले जात होते. याप्रकरणी फडणवीस यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
फडणवीस म्हणाले की, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात भाजपने प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांचे नाव कधीही घेतले नाही. मात्र, सीबीआयकडे तपास गेल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत, ते आश्चर्यचकित करणारे आहेत.
सीबीआयकडे तपास जायच्याआधी हे खुलासे का झाले नाहीत? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. आठ हार्ड डिस्क नष्ट करण्यात आल्याचे मला माध्यमांतून समजतंय. यातूनच मुंबई पोलिसांवर काय दबाव होता किंवा अडचण होती अथवा राजकीय दबाव होता की त्यांनी त्याची तपासणी केली नाही, असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो, त्यामुळे आता सीबीआय सत्य बाहेर काढेल; परंतु हे जर आधी बाहेर आलं असतं तर पुरावे नष्ट झाले नसते. आपल्याला सत्य लवकर समजलं असतं, या मागे कोण आहे आणि काय घडलं हे समजलं असतं असे सांगत, त्यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा राज्यशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.