खटाव – वर्तमान काळात रक्तदानाला खूप महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाचे आयुष्य फार गतिमान झाले आहे. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या आजारांना व अपघातांना देखील सामोरं जावं लागत आहे. अशावेळी मानवाला प्रचंड प्रमाणात रक्ताची निकड भासत असते. अशा समयी आवश्यक रक्ताचा पुरवठा झाला नाही तर प्रसंगी रूग्णाचे प्राण देखील धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे मानवाच्या अमुल्य जीवनासाठी अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन होणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. प्रियाताई शिंदे यांनी केले.
कै. विठ्ठलराव काटकर सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, खटाव आयोजित कै. विठ्ठलराव काटकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या शिबिराचे आयोजन येथील सनशाईन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी बालाजी ब्लड बँकेच्या डॉक्टरांनी मानवानं रक्तदान करणे वैयक्तिक व सामाजिकदृष्ट्या किती महत्त्वाचे आहे हे उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.
यावेळी इच्छुक रक्तदात्यास बॉटल, बॅग, इअर बड्स, स्मार्टवॉच आदी भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. यावेळी तब्बल ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी शहाजी काटकर, अमोल काटकर, सोमनाथ राजे, जयवंत काटकर आदी सहकारी व बालाजी ब्लड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.