नगर -पावसाळा सुरु होण्यापूर्वी नगरमध्ये नालेसफाई होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातही सावेडी उपनगरांत ज्या ठिकाणी नागरीकांना मागील वर्षी मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले होते. त्या भागात तातडीने सफाईची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका शोभा बोरकर यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सावेडी भागातील एकवीरा चौक ते गुलमोहर रोड, वीर सावरकर मार्ग, नरहरी नगर, रेणुका नगर, दळवी मळा, किर्लोस्कर कॉलनी या भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. मागील वर्षी नाल्यांमध्ये भराव टाकून ते बुजविण्यात आल्याने रासनेनगर भागातील अनेक घरांत गुडघाभर पाणी साचले. त्यातून अनेकांच्या संसारपयोगी साहित्य खराब झाले होते.
याच परिसरातील नागरीकांच्या दुकानांत पावसाचे पाणी घुसले होते. त्यात नाल्यामंधील पाणी घुसल्याने घाण पाण्यातून येणाऱ्या दुर्गंधीचाही खूप मोठा त्रास याभागातील नागरीकांना सहन करावा लागला होता. त्याचा परीणाम नागरीकांच्या आरोग्यावर व आर्थिक नुकसान होवून मोठ्या प्रमाणात हानी झाली होती.
आता भविष्यात हे नुकसान टाळण्यासाठी व नागरीकांच्या आरोग्याचा महत्वाचा प्रश्न असल्याने या भागातील लहान, मोठे उघडे तसेच बंदिस्त नाल्यामंधील गाळ व कचरा तातडीने काढण्याची गरज असल्याची भूमिका बोरकर यांनी व्यक्त केली आहे.