अरुण गोखले
साधू, संत, सद्गुरू सांगतात की, तू देवाचा शोध घे. त्याला आपलासा कर. पण ते त्याला देवाचा नेमका पत्ता काय आहे, ते मात्र सांगत नाहीत. अर्थात त्याच्या या आणि अशा कृती मागेही काहीतरी गुढार्थ लपलेला असतोच. उचित वेळ आली की मग ते त्याचा उलगडा करतात. तो पर्यंत त्यांना हेच अभिप्रेत असते की आपण सांगितल्याप्रमाणे हा जीव देव शोधनाचे कार्य हे किती अंतरिक ओढीने करतोय? तो त्याला कुठे कसा आणि कोणत्या रूपात शोधतोय? जीवाला त्या ईश्वराचे नेमके स्वरूप उमगले आहे का? त्याच्या मनात खरोखरच ही देव शोधण्याची आर्त भावना जागली आहे का? या सर्वांची नीट आणि खोलवरची तपासणी करण्यासाठीच ही नेमकी देव शोधण्याची साधना त्यांनी जीवास दिलेली असते.
माणूस काय करतो? तू त्या देवास शोध म्हटले की मनुष्य लगेच गाठोडे बांधतो आणि दूरवरच्या तीर्थाच्या क्षेत्री जाऊन त्या देवास शोधू लागतो. त्या तीर्थक्षेत्रांच्या प्रवासात त्याला भेटतात, त्या नाना धातूंच्या, नाना आकाराच्या, नाना रूपांच्या देवाच्या मूर्ती. तो त्या मूर्तीत देव शोधू लागतो. प्रसंगी त्या मूर्ती खरेदी करूनही आणतो. पण असे समजा की, त्यातली एखादी मूर्ती भंगली, तुटली तर त्या मूर्तीच्या ठायीची देवत्वाची भावनाही दुभंगते. मग पुन्हा नवा शोध सुरू होतो. त्याचा तोही प्रवास हा अंधारात चाचपडण्यासारखाच असतो. कारण त्याला अजूनही तो ज्याला शोधायला निघाला आहे तो देव आणि त्याचा नेमका पत्ता सापडलेलाच नसतो.
मग खऱ्या आर्त भावानेही शोधून जेव्हा त्याला देव हा नेमकेपणाने कोठे आहे, त्याचा ठावठिकाणा काय, हे गवसत नाही तेव्हा तोच शिणला भागलेला, नाना स्थानी फिरलेला, भटकलेला जीव शेवटी साधू, संत, सद्गुरूंच्या दारात येऊन त्यांनाच शरणागत होतो. सद्गुरू त्याला म्हणतात, “अरे वेड्या! तू असा रे कसा? तुझा देव हा तुझ्या पाशीच असताना तू मात्र त्याला दारोदार बाहेर का बरं शोधत फिरलास? अरे ज्याचा त्याचा देव हा त्याच्या हृदयात आहे. देहाच्या देव्हाऱ्यात आणि हृदयाच्या मंदिरात तो देव वसलेला आहे. बाबारे! आपल्या हृदयातला आत्माराम हाच देव आहे. त्याला पाहा. त्याला शोधा. पण त्यासाठी काय करा तर आधी एके ठायी स्थिर बसा. डोळे मिटा आणि त्याला तुमच्यातच शोधा’.