भारत-अमेरिका संबंध सुधारण्यात अडचण
नवी दिल्ली, दि. 8 – अमेरिकेने पाकिस्तानला नव्याने शस्त्र पुरवठा सुरू केल्यास भारत-अमेरिका संबंध सुरळीत होण्याच्या कार्यात अडचण निर्माण होईल, असा खलिता अमेरिकेला पाठविण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. पाकिस्तानच्या सुरक्षितेस कोठल्याही प्रकारचा धोका नाही, असे चव्हाण यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री डॉ. किसिंजर यांना तातडीचा खलिता पाठवून कळविले. या खलित्यांमध्ये म्हटले आहे की,
भारत-पाक हे उभयतांमधील संबंध सुरळीत करण्याच्या कामी प्रयत्नशील असून त्यात प्रगतीही झाली आहे. त्या दृष्टीने उभय देशांतील सध्याची परिस्थिती तर अतिशय महत्त्वाची आहे. अमेरिकेने अशा स्वरूपाची शस्त्रास्त्र मदत सुरू करण्यामुळे पाकिस्तानच्या संघर्षमय प्रवृत्तीस खतपाणी घालण्यासारखे होईल तसेच हिंदी महासागर विभागात सध्या बड्या राष्ट्रांची लष्करी वाढ चालू असल्याचेही चव्हाण यांनी या खलित्यात नूमद केले आहे.
न्यायाधीशांनाही पगार वाढवून हवेत
मुंबई – महाराष्ट्रातील न्यायाधीशांचे एक शिष्टमंडळ आज “ज्युडिशियल सर्व्हिसेस असोसिएशन’चे अध्यक्ष एम. डी. कांबळी यांचे नेतृत्वाखाली मुख्यमंत्री नाईक यांना भेटले. पगारश्रेणींची पुरर्रचना करावी व तोपर्यंत मध्यावधी वाढ द्यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
आर्थिक सहकार्यासाठी संयुक्त आयोगाची स्थापना
नवी दिल्ली – सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढविण्यासाठी संयुक्त आयोग स्थापन करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. संयुक्त औद्योगिक प्रकल्प दोन्ही पैकी कोणत्याही देशात उभारण्यासाठी सौदी अरेबिया कर्ज देणार आहे.
स्वस्त दरात तेल नाही भारताला सवलतीच्या दरात किंवा उधारीने आम्ही तेल पुरवू शकणार नाही. कारण ते आमचे धोरण नाही. पण तरीही भारताची तेलाची गरज पुरविण्यात अडथळा येणार नाही. तेलाच्या किमतीत कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात येणार नाही.