अरुण गोखले
“क’ म्हणजे कनक, “का’ म्हणजे कामिनी आणि “की’ म्हणजेच कीर्ती या तीन गोष्टी मनासारख्या मिळवायच्या, त्यांचा सुखाभोग घ्यायचा हेच जणू मानवी जीवनात प्रत्येकाचे साध्य असते आणि त्यासाठी प्रत्येक जीव आयुष्यभर आटापिटा करीत असतो.
कनक म्हणजेच धनसंपत्ती, पैसाआडका मिळवण्यासाठी मनुष्य आयुष्यभर मरमर कष्ट करीत असतो. घाम गाळत असतो. प्रसंगी हवे ते आणि हवे तेवढे मिळवण्याच्या हव्यासापायी तो आपल्या नीतिमूल्यांना, सचोटीला, प्रामाणिकपणालाही मूठमाती देतो. पण ही धनसंपत्तीची तृष्णा कधीही पूर्ण होत नाही. तिला अतृप्तीचा शाप आहे.
त्याच्या जीवाला आणखी एक भुरळ घालणारी, त्याला स्वत:भोवती फिरवणारी दुसरी असते ती कामिनी. या कामिनीच्या प्रेमपाशात मनुष्य इतका बांधला जातो की, प्रत्यक्ष आपल्या जन्मदात्यांनाही विसरतो. सोयीस्करपणे त्यांच्याकडे पाठ फिरवतो आणि कामिनीच्या प्रेममिठीत जाऊन फसतो.
ती त्याला तिच्या रूप सौंदर्याच्या गुणावर भुलावत असते. तो मकरंदासाठी कमलिनीत अडकणाऱ्या भुंग्याप्रमाणे किंवा ज्योतीला मिठीत घेण्यापायी स्वत: जळून जाणाऱ्या पतंगाप्रमाणे या कामिनीच्या पाशात आपले सर्वस्व वेचित असतो.
तिसरी जीवास भुलावण पाडत असते ती त्याच्या नाम लौकिकाची, कीर्तीची, मोठेपणाची, बडेजावाची. ही कीर्ती, वैभव, मानसन्मान आणि मोठेपणा हासुद्धा काही कायम टिकणारा असत नाही. उलट तो मिळवण्यासाठी, प्रसंगी टिकवण्यासाठी माणसाचे कधी नैतिक मूल्यांपासून अध:पतन होते, ते त्याचे त्यालाच कळत नाही.
यासाठीच साधू, संत, सत्पुरुष हे आपल्याला परोपरीने हेच सांगत असतात की बाबाहो! या “क’ “का’ “की’ च्या घसाऱ्यापासून दूर राहा. त्याच्या अधिक आहारी जाऊ नका. कोणतीही गोष्ट ही प्रमाणात आणि गरजेपुरतीच असावी. तिचा अतिरेक झाला, तर ती तुमचाच घात करते.
या “कनक’, “कामिनी’ आणि “कीर्ती’च्या मागे लागून ती तुम्हास हवी तशी आणि हवी तेवढी मिळेलच, असे होत नाही. त्यामुळेच तुम्ही तुमच्या जीवनात दु:खी कष्टी होता. या तीन गोष्टींची आसक्ती हीच तुमच्या दु:खाचे, अतृप्तीचे, असमाधानाचे मूळ आहे.
ते ओळखून त्यांचा गरजेपुरताच वापर करा. ज्याने तुमची मन:शांती ढळणार नाही, अशा पारमार्थिक सुखाचा विचार करा. सुख, समाधान देणारा मार्ग शोधा. त्यातच तुमचे कल्याण आहे.