अरुण गोखले
मानवी जीवनातले सुख आणि समाधान हे एक मृगजळ आहे. माणूस त्याला अपेक्षित असणारे सुखसमाधान आणि आनंद मिळविण्यासाठी खरोखरच जन्मभर आटापिटा करीत असतो. सुखाच्या मृगजळामागे तो ऊर फुटेपर्यंत धावतो. त्यासाठी नाही नाही त्या खटपटी करतो. अपार कष्ट करतो, मेहनत करतो, घाम गाळतो. पण तरीही त्याला अपेक्षित सुखसमाधान आणि आनंद त्याच्या जीवनात मिळतोच असे नाही. उलट ह्या धावपळीत तो अधिक दु:खीकष्टी नि निराश होतो.
आता हे असे का होते? इतके परिश्रम घेऊनही, प्रयत्न करूनही जे आणि जेवढे हवे तेवढे का मिळत नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर जर आपण जाणकार, खऱ्या मार्गदर्शकांना विचारायला गेलो तर ते आपल्याला असे विचारतात की, बाबारे! तू आधी मला एक गोष्ट सांग, की समजा एखाद्या माणसाने खूप मेहनत घेऊन एक पाण्याची बादली भरून आणली, पण जर त्या बादलीला छिद्रे असतील, ती फुटलेली असेल, तर काबाडकष्ट करून उरापोटावरून आणलेले ते सुखासमाधानाचे पाणी हे त्या बादलीत शिल्लक राहील का? नाही. ते टिकणारच नाही. त्याप्रमाणेच आपल्याही जीवनरूपी बादलीला आपल्याच मनोवृत्तीची छिद्रे पडलेली आहेत.
त्यामुळेच त्या तशा फुटल्या बादलीतले सुखासमाधानाचे पाणी हे टिकून राहात नाही, तर ते गळून जाते. निघून जाते. त्यामुळेच काल जो माणूस आपल्याला सुखीसमाधानी दिसतो तो आज मात्र सुखीसमाधानी असत नाही.
त्याचे कारण असे की माणसाच्या जीवनरूपी बादलीला असणारी वृत्तीची छिद्रे. मानवी मनातल्या वृत्ती या क्षणोक्षणी बदलत असतात.
मानवी जीवनातील सुखाच्या समाधानाच्या जागा, वस्तू, वेळ, प्रसंग, लोक हे सारखे बदलत असतात. माणसाच्या मानसिक वृत्तींच्या खेळावरच त्याचे सुखसमाधान अवलंबून असते. इथे समर्थ रामदासांचे वचन आठविल्याशिवाय राहात नाही. “जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे.’
हा वैचारिक शोध घेतला तर त्याचे उत्तर एकच मिळते ते म्हणजे “कोणीच नाही.’ आपल्याला आपल्या खऱ्या सुखासमाधानाची जागाही कळायला, सापडायला हवी. त्यासाठी मात्र एक करायला हवे की आपण सद्गुरूंच्या बोधाने आपल्या जीवनरूपी बादलीची वृत्तीची छिद्रे बुजवायला हवीत.