– वंदना बर्वे
राजकीय वंशवादाचा वटवृक्ष फक्त काँग्रेस आणि महाविकास आघाडीत दिसून येतो असं नाही तर भाजप आणि रालोआतील घटक पक्षसुद्धा वंशवादाच्या छत्रछायेखाली राजकारण करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वंशवादाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा चांगला समाचार घेतला. मात्र, यानंतर विरोधी पक्षांनीसुद्धा भाजप आणि रालोआतील घटक पक्षांमध्ये पसरलेला वंशवाद मतदारांपुढे मांडायला सुरुवात केली आहे. 18व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात वंशवादाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी भाजपप्रणित रालोआने या मुद्द्यावरून विरोधी पक्षांना सळो की पळो करून सोडलं होतं; परंतु भाजप आणि रालोआतील घटक पक्षांच्या उमेदवारांची नावं जसजशी जाहीर होऊ लागली तसतशी रालोआला वंशवादाच्या मुद्द्यावर मौन बाळगावे लागत आहे.
भाजप असो वा काँग्रेस किंवा सत्ताधारी पक्षाचा वा विरोधी बाकावर बसणारा पक्ष असो सर्वांनी लोकसभेच्या निवडणुकीत वंशवादाला खतपाणी घातलं आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कामाख्यापर्यंत पसरलेल्या या देशातील प्रत्येक राज्यांत राजकीय पक्षांनी वंशवादाला प्रोत्साहन दिले आहे. लोकसभा निवडणुकीत असे कितीतरी उमेदवार आहेत ज्यांची आई किंवा वडील किंवा नातलग केंद्र आणि राज्यात मंत्री, खासदार, आमदार राहिले आहेत. यात अग्रभागी रालोआ आहे, असं म्हणावं लागेल. महत्त्वाचे म्हणजे, राजकीय पक्षांतील नेत्यांची नवीन पिढी 18व्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करीत आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि भाजपा या दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. यात अशा तरुणांचा समावेश आहे जे परदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी आले आहेत.
तसं बघितलं तर, वंशवादाचा मुद्दा पुढे येताच पहिलं नाव डोळ्यापुढं येतं ते गांधी-नेहरू घराण्याचं आणि उत्तर प्रदेशचं नाव येताच ज्याचं नाव डोळ्यापुढे येतं ते आहे समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यादव यांचं. हे खरं असलं तरी देशातील प्रत्येक लहान-मोठ्या पक्षामध्ये वंशवादाची वेल पसरली आहे. समाजवादी पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीस आणि जसवंतनगरचे आमदार शिवपालसिंह यादव यांना बदायूंमधून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. मुळात, शिवपाल यादव यांनी मुलगा आदित्य यादव यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने शिवपाल यादव यांना तिकीट दिले आहे. आतापर्यंत त्यांच्या प्रचाराची धुरा आदित्य हेच बघत होते. 36 वर्षांचे आदित्य इंजिनिअर आहेत आणि इफ्कोच्या संचालक मंडळावर आहेत. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना पुन्हा एकदा सपाचे दिवंगत नेते मुलायमसिंग यादव यांच्या मैनपुरी मतदारसंघातून उतरविण्यात आले आहे. मुलायमसिंग यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डिंपल यादव येथून विजयी झाल्या होत्या.
सपाचे आणखी एक राष्ट्रीय सरचिटणीस आणि पाच वेळा आमदार राहिलेले इंद्रजित सरोज यांचे पुत्र पुष्पेंद्र सरोज यांना कौशांबीमधून तिकीट देण्यात आले आहे. इंद्रजित कौशांबीच्या मांझनपूर मतदारसंघातून आमदार आहेत. 25 वर्षीय पुष्पेंद्र सरोज यांनी लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधून अकाउंटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे शालेय शिक्षण डेहराडूनच्या वेल्हम बॉइज स्कूलमधून झाले. त्यांची लढत भाजपचे दोन वेळा खासदार राहिलेले विनोद सोनकर यांच्याशी आहे. केरकट मतदारसंघातून सपा आमदार आणि माजी खासदार तुफानी सरोज यांची कन्या प्रिया सरोज यांना मच्छली शहरामधून उमेदवारी दिली आहे. दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर प्रिया सर्वोच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करत आहे. त्यांची लढत भाजपच्या विद्यमान खासदार बी. पी. सरोज यांच्याशी आहे.
कैरानाच्या हसन कुटुंबातील माजी खासदार मुनव्वर हसन आणि तबस्सुम हसन यांची कन्या इकरा हसन सपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. त्यांचा भाऊ नाहिद हसन हे सपाचे आमदार आहेत. 2022च्या विधानसभा निवडणुकीतही इकरा यांनी नाहीद यांचे निवडणूक व्यवस्थापन हाताळले होते. इकरा हसन यांनी लंडन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. भारतीय जनता पक्षाने देवरिया लोकसभा मतदारसंघातून शशांक मणि त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे वडील सेवा निवृत्त लेफ्टनंट जनरल प्रकाश मणि त्रिपाठी हे दोन वेळा खासदार होते. ते 1996 आणि 1999 मध्ये दोन वेळा देवरियातून खासदार म्हणून निवडून आले होते. दिल्लीच्या आयआयटीमधून बी. टेक् झालेले शशांक मणि त्रिपाठी यांनी स्वित्झर्लंडमधून एमबीए केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विद्यमान खासदार रमापती राम त्रिपाठी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत काँग्रेस आणि सपा आघाडीचे उमेदवार अखिलेश प्रतापसिंह यांच्याशी आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळातील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि सुभासपाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांचे पुत्र अरविंद राजभर घोसीमधून निवडणूक लढवत आहेत. अरविंद हे ओमप्रकाश राजभर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि पक्षाचे प्रवक्ते आहेत. ओम प्रकाश हे गाझीपूरच्या जहुराबाद मतदारसंघातून आमदार आहेत. भाजप आघाडीचा भाग असलेल्या सुभासपाला लोकसभेची एक जागा मिळाली आहे. सुभासपा ‘काठी’ या निवडणूक चिन्हावर लढत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला घोसीमधून पराभव पत्करावा लागला होता. येथे बसपने भाजपचा 1,22,568 मतांनी पराभव केला. यावेळी सपाने घोसी येथून राजीव राय यांना तिकीट दिले आहे.
माजी केंद्रीय पोलाद मंत्री आणि सपा नेते दिवंगत बेनी प्रसाद वर्मा यांची नात म्हणजे श्रेया वर्मा. सपाने श्रेया वर्मा यांना गोंडामधून तिकीट दिलं आहे. त्यांचे वडील राकेश वर्मा सपा सरकारमध्ये तुरुंगमंत्री होते. डेहराडूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर श्रेया वर्मा यांनी दिल्लीच्या रामजस कॉलेजमधून अर्थशास्त्र ऑनर्सचे शिक्षण घेतले. श्रेया समाजवादी महिला आघाडीची राष्ट्रीय उपाध्यक्षाही आहे. त्यांची स्पर्धा विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार कीर्तिवर्धन सिंह यांच्याशी आहे. भाजपचे विद्यमान खासदार अक्षयवर लाल यांचे पुत्र डॉ. आनंद गोंड बहराइचमधून निवडणूक लढवत आहेत. वडिलांऐवजी भाजपने त्यांना तिकीट दिले. सुमारे 50 वर्षांच्या आनंद यांनी एमबीए आणि पीएच.डी. केली आहे. त्यांची स्पर्धा सपाचे रमेश गौतम यांच्याशी आहे.
मुळात, सध्या वंशवादी पक्षांचा सर्वाधिक फायदा कुणाला होत असेल तर तो भाजप आणि रालोआला होताना दिसतो आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचा बिहारमधील पक्ष असो वा हरियाणातील चौटाला यांचा पक्ष असो किंवा महाराष्ट्रातील शिवसेना आणि राकाँ हे पक्ष असोत, या सर्व पक्षातील फुटीचा फायदा भाजपला होताना दिसतो आहे. पंतप्रधानांनी घराणेशाहीच्या राजकारणासाठी राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर शरसंधान साधले आहे. मात्र, अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडीमुळे नाण्याची दुसरी बाजू जी रालोआची आहे ती सत्ताधारी पक्षासाठी मोठी डोकेदुखी आहे, हे एक कटू सत्य असून ते स्वीकारावे लागेल.
बिहार आणि उत्तर प्रदेशचे राजकारण हे जातीभोवती फिरते. अशात, भाजपने यूपी आणि बिहारमधील ज्या राजकीय पक्षांसोबत आघाडी केली आहे ते सर्व पक्ष वंशवादाच्या सावलीत वाढलेले आहेत. दोन्ही राज्यांत जातीआधारित पक्षांची स्वतःची व्होट बँक आहे आणि दोन्ही राज्यांत जिंकायचे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, हेही सत्य आहे. तसं बघितलं तर, भाजपचा प्रवास हा ‘पार्टी विथ द डिफरन्स’ या टॅगलाइनने झाला होता. भाजपने 2000 मध्ये कात टाकली आणि नवी पिढी पक्षात आली. भाजपमध्ये घराणेशाहीला सुरुवात झाली तो हाच काळ होय. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे चिरंजीव दुष्यंत सिंह, राजनाथ सिंह यांचा मुलगा पंकज सिंह, कल्याण सिंह यांचा मुलगा राजवीर सिंह, प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन आणि हुकुमदेव नारायण यांचे पुत्र अशोक यादव आणि हिमाचल प्रदेशातील प्रेमकुमार धुमल यांचे चिरंजीव अनुराग ठाकूर ही नावे राजकारणात सक्रिय झाली. याशिवाय, भाजपने कुटुंबवादावर चालणार्या शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांसोबत युती करूनच राजकारणात पुढचा टप्पा गाठला. सध्या यूपीत केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचा अपना दल आणि निषाद पक्ष रालोआचा भाग आहे आणि हे दोन्ही पक्ष कुटुंबवादाचे उदाहरण होय.