मुंबई – मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले होते. त्यानंतर रविवारी 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असतानाच राष्ट्रवादीची भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचा मोठा दावा केला आहे. एका मुलाखतीदरम्यान प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या मार्गावर असतानाच राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी भाजपसोबत युती करावी असे पत्र शरद पवार यांना दिले होते. पण राष्ट्रवादीचे नेतृत्व वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले आणि एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. ‘
पुढे ते म्हणाले की, “राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नेत्यांना आपण शिवसेनेशी जुळवून घेत असू तर भाजपशी हातमिळवणी करण्यात काहीच गैर नाही, असे वाटत होते. सेनेसोबत आमचे अनेक दशकांपासून वैचारिक मतभेद होते, पण तरीही आम्ही सरकार स्थापन केले. आता आम्ही राष्ट्रहितासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली, ही विचारप्रक्रिया नवीन नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो.”
“आतापर्यंत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या आणखी आमदारांचा समावेश केला जाईल. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार खात्यांच्या वाटपावर चर्चा करत आहेत,” असेही त्यांनी सांगितले. अनेक आमदारांना मतदारसंघासाठी निधी वाटप, शेतकऱ्यांना आर्थिक मदत सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असल्याने हे प्रश्न सोडवले जातील अशी आमची अपेक्षा आहे,” असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.